शनिवार, २८ मार्च, २००९

कसाबचा "हिसाब' चुकता करीन ः ऍड. निकम

"गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्याने राज्यच नव्हे तर देश हादरला होता. त्यामधील जिवंत पकडला गेलेला अतिरेकी अजमल कसाब याच्याविरुद्धचा खटला आता सुरू झाला आहे. सुमारे सात महिन्यांत त्याचे कामकाज पूर्ण होईल. या खटल्यात कसाबचा हिसाब निश्‍चित चुकता करीन, असा आपल्याला विश्‍वास आहे.
- ऍड. उज्ज्वल निकम
विशेष सरकारी वकील


(नगर येथील जैन सोशल फेडरेशनतर्फे आयोजित महावीर व्याख्यान मालेत "दहशतवाद आणि मी' या विषयावर ऍड. उज्ज्वल निकम यांचे व्याख्यान झाले. त्यातील काही अंश....)

"अतिरेक्‍यांची पाठराखण करणाऱ्या देशांविरुद्ध युद्ध करून दहशतवाद संपणार नाही. मूठभर अतिरेक्‍यांसाठी बहुसंख्य गरिबांचे प्राण घेण्यापेक्षा अतिरेक्‍यांना आणि त्यांच्या म्होरक्‍यांना कायद्याच्या कचाट्यात आणून कायद्याचा वचक निर्माण केला पाहिजे. 18 ते 20 वर्षांपासून आपण दहशतवाद्यांच्या विरोधातील खटले चालवीत आहोत. मात्र, न्यायालयात वकील आणि पोलिसांच्या जोडीला साक्षीदारांची साथही मोलाची असते. सरकारी वकील म्हणून काम करताना त्यासाठी अनेक भूमिकांमधून जावे लागते. अनेकदा दहशतवाद्यांकडून धमक्‍याही आल्या; पण आपण डगमगलो नाही. चित्रपटसृष्टीतील लोकांच्यासंबंधित खटले चालविण्याची वेळ आली, त्यामुळे त्या लोकांनाही जवळून अनुभवता आले. त्यामुळे अशा लोकांच्या मागे आपली तरुण पिढी का धावते, असा प्रश्‍नही आपल्याला पडला.''
""पाकिस्तानशी युद्ध करून दहशतवाद संपणार नाही. असा विचार करणेही एकप्रकारे दहशतवादच आहे. तेथील अतिरेकी संघटनांना आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांना कायद्याच्या जाळ्यात ओढून शिक्षा दिल्याशिवाय दहशतवाद संपणार नाही. आपल्या देशात येऊन काश्‍मीरसंबंधी अप्रत्यक्ष धमक्‍या देणाऱ्या मुशर्रफ यांचा कायदेशीर समाचार घेण्याची गरज आहे. गुन्हेगारांनाही किती अवास्तव प्रसिद्धी दिली जाते, ते संजय दत्त प्रकरणातून समजले, असे प्रकार थांबले पाहिजेत. लोकसंख्येला आळा घालणे, गरीब-श्रीमंतातील वाढती दरी कमी करून सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणे, हेही दहशतवाद रोखण्याचे उपाय आहेत.''
श्री. निकम हे कायदे तज्ज्ञ म्हणून सर्वांना परिचित आहेत. मात्र, ते हळव्या मनाचे कवी आहेत, शेरोशायरीही करतात, याचा प्रत्यय नगरकरांना प्रथमच आला. गंभीर विषयावरील आपल्या या व्याख्यानाची सुरवातच त्यांनी कवितेच्या जुन्या आठवणींपासून केली. "बायको कोणाला म्हणावे' ही आपली पहिली कविता त्यांनी सादर केली. कोणाला प्रेमातून, कोणाला विरहातून कविता सुचतात आपल्याला मात्र संतापातून कविता सुचत होत्या, असे सांगून त्यांनी आणखी काही कविताही सादर केल्या. चांदवड येथील शीख अतिरेक्‍यांविरूद्ध त्यांनी चालविल्या पहिल्या खटल्यापासून ते सध्याच्या कसाबविरूद्धच्या खटल्यापर्यंत महत्त्वाच्या प्रकरणांतील किस्से त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: