सोमवार, १५ मे, २०२३

तुम्हीच सांगा पाहुणं, कुठं जातील शेतकरी पोरं?

जो तो मुलगा म्हणतो मजला

बायको पाहिजे गोरी.

आता तुम्हीच सांगा पाहुणं

कुठं जातील काळ्या पोरी?

प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांनी गायलेले हे गीत. त्या काळात आणि आजही मुलींच्या लग्नासंबंधीच्या अडचणींचे वास्तव मांडणारे आहे. रंगाचा प्रश्न जेवढा गंभीर आहे, तेवढाच आता व्यवसायाचा बनला आहे. बदलत्या काळात समाजमनही बदलले आहे. सध्या अशा मुलींच्या लग्नापेक्षाही शेतकरी मुलांची लग्न जमणे अवघड झाले आहे. शेती आणि शेतकरी यांचे जे चित्र बनले आहे किंवा निर्माण करण्यात आले आहे, त्यामुळे शेतकरी नवरा नकोच अशी मुलींची भावना झाली आहे.

काय आहे प्रश्न?

गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात सोलापूरमध्ये लग्नाळू युवकांनी एक मोर्चा काढला होता. त्यांची, विशेषत: शेतकरी मुलांची लग्न जमत नाहीत, या समस्येकडे लक्ष वेधणारा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला होता. अर्थात ही समस्या केवळ सोलापूरची नाही, राज्यभर हीच परिस्थिती आहे. राज्यातच नव्हे तर कर्नाटकातही यापूर्वी असाच एक मोर्चा निघाला होता. त्यावरून ही समस्या सर्वत्र असल्याचे दिसून येते. सोलापूरमधील आंदोलनामुळे याची जाहीर चर्चा सुरू झाली. ही समस्या आहे, यावर उपाय केला पाहिजे, अशी चर्चा आता सुरू झाली. म्हणूनच सांगलीतही त्याचे पडसाद उमटले. तेथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी केवळ प्रश्न मांडला नाही, तर त्यावर एक उपायही सूचविला आहे. शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न एक सामाजिक समस्या बनत चाललेली आहे. हे लक्षात घेता राज्य सरकारने आता शेतकऱ्याच्या मुलाबरोबर लग्न करणाऱ्या मुलीच्या नावावर दहा लाख रुपयांची ठेव, त्याचबरोबर मुलीच्या वडिलांच्या नावे पाच लाख रुपयांची ठेव ठेवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. तर काही गावांनी यासाठी पुढाकार घेऊन त्यांच्या पातळीवर यावर उपाय आणि योजना आखण्यासही सुरवात केली आहे. एकूणच आता किमान हा प्रश्न आहे, हे तरी मान्य व्हायला लागले आहे. पूर्वी रंग आणि इतर कारणांमुळे लग्न जमण्यास अडचणी यायच्या. त्यात आता या नव्या कारणाची भर पडली आहे. शेतकऱ्यांच्या मुलाशी लग्न करण्यास मुली तयार होत नाहीत. इतर घटकांतीलच नव्हे तर एक शेतकरीही आपल्या मुलीचा विवाह दुसऱ्या शेतकऱ्याशी लावून देण्यास तयाह होत नसल्याचे दिसून येते.

काय आहेत कारणे?

उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. असे आपल्याकडे पूर्वी मानले जात होते. पन्नास-साठ वर्षांपूर्वी हे तत्व मानले आणि पाळले जात होते. त्यामुळे शेती आणि शेतकरी यांना सर्वच बाबतीत प्राधान्य होते. एवढेच कशाला अलीकडच्या काळात नोकरी व्यावसायातील मुलांची लग्न जमवितानाही गावी शेती आहे का? हे पाहिले जायचे. हळूहूळ हे समीकरण बदलत गेले. तिसऱ्या स्थानावर असलेली नोकरी पहिल्या स्थानावर कधी आली ते कळलेच नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचा कल आता नोकरीकडे आहे. त्यामुळे लग्न करतानाही नोकरी हाच प्राध्यान्यक्रम लावला जातो आहे. मोठ्या बागायतदार मुलापेक्षा शहरात शिपाई अगर खासगी कारखान्यात छोटी-मोठी नोकरी करणारा मुलगा असला तरी चालेल, असे मानणारा मोठा वर्ग तयार झाला आहे.
ही अवस्था का आली? शेतकऱ्यांना असा नकार का दिला जातो? याची कारणे पाहिली तर शेती आणि शेतकरी यांचे जे चित्र सध्या झाले आहे किंवा निर्माण केले आहे, तेच प्रमुख कारण असल्याचे दिसून येते. अवकाळी पाऊस असो, दुष्काळ असो, शेती मालाचे पडलेले भाव असो या निमित्ताने शेती आणि शेतकऱ्यांचे विदारक चित्र निर्माण केले जाते. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेतच. ते मांडले पाहिजेत. त्यावर चर्चा आणि सरकारी पातळीवरून उपायही झाले पाहिजेत, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, ही मांडणी करताना शेतकरी आणि एकूणच शेती व्यावसायाबद्दल इतर घटकांचे गैरसमज होणार नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. प्रसार माध्यमांतून यासंबंधी दिल्या जाणाऱ्या बातम्या, त्यावर राजकारण्यांच्या प्रतिक्रिया, उपकार केल्याप्रमाणे जाहीर केल्या जाणाऱ्या योजना, भीक घातल्याप्रमाणे दिली जाणारी वागणूक, इतर घटकांतून शेतकऱ्यांबद्दल व्यक्त होणारी मते. कर्जबाजारीपणा, त्यातून होणाऱ्या वृद्ध आणि तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्यांच्या पश्चात कुटुंबांचे होणारे हाल अशी परिस्थिती अतिशय विदारकपणे मांडली जाते. शेतकऱ्यांच्या समस्या आणि कठीण जीवन हेच चित्र रंगवून सांगितले जाते. सर्वच शेतकरी म्हणजे सतत अडचणींचा सामना करणारे, जीवनात रस नसलेले, कोणाच्या तरी उपकारावर, मदतीवर अवलंबून राहणारे असेच चित्र दाखविले जाते. तेच सर्वसामान्य वास्तव आहे, सर्वत्र घडते आहे, असाच अभास निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा अडचणीच्या ठिकाणी आपली मुलगी कशाला द्यायची? असा विचार मुलीचे पिता करतात. सोबतच या बातम्या पाहून तसेच मत मुलींचेही बनलेले असते. अर्थात यामागे उद्देश शेतकऱ्यांची बदनामी करण्याचा नसेलही. त्यांचे चित्र समाज आणि सरकारपुढे मांडून त्यांना नुकसानभरपाई मिळवून देणे, शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत होणे, असा संबंधितांचा हेतू असू शकतो. मात्र, त्यातून हे प्रश्न निर्माण होत आहेत, हेही नाकारून चालणार नाही. चित्र मांडणाऱ्या घटकांनी यांची नोंद घेतलीच पाहिजे.

जाहिरातींचा परिणाम

दुसरीकडे मुलींची मानसिकता तयार होण्यासाठी विविध उत्पादनांच्या जाहिराती कारणीभूत आहेत. अर्थात याचा शेतीशी काडीमात्र संबंध नाही. असे असले तरी जाहिरातीत जे जोडपे, कुटुंब दाखविले जाते, ते पाहून मुलींना आपलेही असेच व्हावे, असे वाटत असते. या अभासी जगात त्याही स्वप्न रंगवितात. कोणत्याही उत्पादनाची जाहिरात असो, त्यात आकर्षक चित्र उभे केले जाते. नोकरी करणारा, गलेलठ्ठ पगार असणार नवरा, घरी आल्यावर बायकोच लाड करणारा, सुखनैव जीवन जगणारी, चकचकीत घरात राहणारी त्याची बायको. अलिशान गाडीतून फिरणे, शॉपिंग, सहली मुख्य म्हणजे कोणतेही कष्ट न करता अडचणींचा सामना न करता जगणारे हे कुटुंब दाखविणाऱ्या काही सेकंदांच्याच जाहिराती असतात. त्यांचा हेतू हा त्यांचे प्रॉडक्ट विकण्यापुरता असतो, हे खरे. मात्र त्याचा वेगळा परिणाम लग्नाळू मुलींवर नव्हे लग्न झालेल्या महिलांवरही होत असतो. आपलेही कुटुंब असचे हवे अशा स्वप्नात रंगून त्या वास्तव नाकारू लागतात. अर्थात त्यांनीही अशा सुखी संसाराची स्वप्ने पाहणे चुकीचे नाही. मात्र, केवळ हेच सुख आहे, शेती करणाऱ्यांकडून ते मिळू शकत नाही किंवा या सुखाला पर्याय नाही, असे चित्र निर्माण होता कामा नये. पूर्वीच्या काळात चित्रपट, नाटके, टीव्ही मालिका यामधूनही जमीनदार शेतकऱ्यांचा रुबाब दाखविला जात असे. त्यांची प्रतिष्ठा, त्यांचे सुखी आणि मानसन्मानाचे जीवन दाखविले जात असे. अर्थात तो काळ उत्तम शेती मानण्याचा होता. अलीकडच्या काळात हे चित्रही बदलले आहे. बहुतांश चित्रपट, नाटके आणि मालिकाही वेगळ्या धाटणीचे येत आहेत. त्यातून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष शेतकरी आणि शेती क्षेत्राची अपप्रतिष्ठाच होत आहे. याचाही मुलींच्या मनावर परिणाम होत आहे. काळ बदलला, लाईफ स्टाईल बदलली असे म्हणून समाजही या समजाला बळकटी देत आहे. त्यातून हे पश्न निर्माण होत आहेत.

काय करता येऊ शकेल?


एका बाजूला मुलींचा जन्मदर कमी होत असताना विवाह ही सार्वत्रिक समस्या बनली आहे हे खरे आहे. त्यासाठी स्त्री जन्माचे स्वागतासारखे उपक्रम सुरू आहेत. सरकारकडूनही विविध योजना राबविण्यात येत आहेत. काही ठिकाणी यातून सेक्स रेशो सुधारत असल्याचे आढळून येते. खरे तर मुलींची लग्न जमणे आणि ती खर्चिक होणे यातून हा प्रकार सुरू झाला होता. त्यातून मुलींची संख्या कमी होऊन आता मुलांची लग्न न जमण्यापर्यंत संकट पोहोचले आहे. त्यात शेतकऱ्यांच्या मुलांना नकार मिळणे ही आणखीच नवीन समस्या निर्माण झाली आहे. मुलींचा जन्मदर वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तसेच प्रयत्न यासाठी कारणीभूत ठरणारे इतर गैरसमज दूर करण्यासाठी झाले पाहिजे. शेती आणि सगळ्याच शेतकऱ्यांची स्थिती दाखविली जाते, एवढी वाईट नक्कीच नाही. एखाद्या क्षेत्राचे चांगले चित्र रंगविताना दुसऱ्या क्षेत्राबद्दल गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. याचा विचार केवळ चित्र मांडणाऱ्यांनी नव्हे तर शेतकऱ्यांनीही केला पाहिजे. सरकारचे लक्ष वेधून नुकसानभरपाई अगर अन्य कामे होण्यासाठी आपणच आपल्या क्षेत्राचे किती वाईट चित्र सांगायचे? याचा विचार त्यांनीही केला पाहिजे. दुसरीकडे सरकारने एवढे संवेदनहीन होऊ नये की मदतीची आपेक्षा करणाऱ्यासाठी असे चित्र मांडणे आवश्यक ठरावे. एकूणच समाज आणि सरकार या दोघांनीही याकडे गांभीर्याने पाहून याबद्दल झालेले आणि होणारे गैरसमज थांबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जे वाईट आहे, वास्तव आहे ते आलेच पाहिजे. मात्र, ओढूनताणून विदारक चित्र मांडले जाऊ नये, याची काळजी घेण्याची गरज आहे. याच्या जोडीला जे चांगले आहे, ज्यात यश आले आहे, अशा संघर्षशील, कुटुंबवत्सल आणि प्रगतीकडे झेपावलेल्या शेतकरी पुत्रांचाही सन्मान झाला पाहिजे. शेवटी शेतकरी देशाचा अन्नदाता आहे, खरा मालक आहे, ही प्रतिमा टिकली पाहिजे.

(पूर्व प्रसिद्धी महाराष्ट्र टाइम्स)