शनिवार, १४ फेब्रुवारी, २००९

कशी होणार तंटामुक्ती?


राज्य सरकारने दोन वर्षांपासून सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला दुसऱ्याच वर्षी घरघर लागली आहे. दुसऱ्या वर्षीचा अखेरचा टप्पा आता सुरू झाला आहे. पहिल्याच वर्षी अनेक अडथळे आलेल्या, अनेक अनुभव घेतलेल्या या मोहिमेत आता काही सुधारणा केल्या गेल्या; पण या मोहिमेचे खरे यश, तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्याशिवाय दिसणार नाहीत. त्यासाठी ही सरकारी मोहीम न राहता चळवळ होण्याची गरज आहे. मात्र, योजनेचे शिल्पकार तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यामागे ही मोहीम आता बंद पडल्यात जमा आहे.आपल्या देशाला चळवळींची परंपरा आहे. ब्रिटिशांची सत्ता उलथवून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामागेही चळवळींचीच ताकद मोठी होती. ती काही सरकारी योजना नव्हती, त्यासाठी कोणाला पदे दिली नव्हती, कोणाला अधिकार नव्हते, प्रवास खर्च, बैठक भत्ता, स्टेशनरी खर्च असला प्रकारही त्या वेळी नव्हता. तरीही चळवळ चालली अन्‌ यशस्वी झाली. स्वातंत्र्यलढ्याची तुलना या मोहिमेशी केली जाऊ शकत नाही; मात्र अशा चळवळींची पार्श्‍वभूमी असलेल्या या देशात पदरमोड करून समाजकार्य करणाऱ्यांची संख्या आजही कमी नाही. अशा लोकांना या मोहिमेत आणले पाहिजे. लोकांमध्ये मिरविण्यासाठी, पदांची हौस भागविण्यासाठी, आपल्या कृत्यांना अन्‌ धंद्यांना संरक्षण मिळविण्यासाठी आणि सत्तेचा मार्ग सोपा होईल या हेतूने या मोहिमेकडे पाहणाऱ्यांना त्यात स्थान मिळाल्यास निरपेक्ष भावनेने काम कसे होणार? तंटे मिटविण्यासाठी कायदेशीर मार्गाची, सरकारी खर्चाची यंत्रणा आहेच; पण वाढत्या तंट्यांच्या तुलनेत ती कमी पडते आहे. शिवाय त्याचा त्रास लोकांनाच सहन करावा लागत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी तर ही मोहीम आणली आहे; मात्र यामध्ये काम करणाऱ्या अनेकांनादेखील हे समजलेले दिसत नाही. त्यामुळे आढावा बैठकांमध्ये अवास्तव मागण्या केल्या जात असल्याचे दिसते. यातील त्रुटी दूर करताना त्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठीही प्रयत्न केले पाहिजेत. पोलिस आणि महसूल या दोन खात्यांवरच या मोहिमेची मुख्य जबाबदारी दिसते. बहुतांश तंटेही त्यांच्याशीच संबंधित आहेत. प्रत्यक्ष तंटे मिटविण्याची प्रक्रिया तशी किचकट. शिवाय तिला कायदेशीर मान्यता मिळवून देणे हेही वेळखाऊ काम आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी लोकन्यायालये किंवा ग्रामन्यायालयांसारखे उपक्रम घेऊन, मिटलेल्या तंट्यांवर लगेचच कायदेशीर मोहर उमटविण्याचे प्रयत्न करावे लागतील, अन्यथा या मोहिमेच्या जाहिरातीप्रमाणे यातील तंट्यांचे "भिजत घोंगडे' कायम राहील. एक योजना आली होती, असाच या मोहीमेचा इतिहास होईल.

1 टिप्पणी:

shaileshsahare@gmail.com म्हणाले...

how to get my given money from a person of a village?