शनिवार, १६ जानेवारी, २०१०

नवीन बारा पोलिस ठाण्यांना मंजुरी

पोलिस दलाच्या सक्षमीकरणाचा एक भाग म्हणून सरकारने राज्यात नवीन बारा पोलिस ठाणी आणि 32 पोलिस चौक्‍यांना मंजुरी दिली आहे. सध्याच्या पोलिस ठाण्यांचे विभाजन करून ही नवी पोलिस ठाणी निर्माण करण्यात येणार आहेत. लवकरच सात हजार, 671 पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. राज्य सरकारने तसा निर्णय घेतला असून पोलिस दलाला अंमलबजावणीच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

आघाडी सरकारने 2005 मध्ये राज्यात 55 हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. दर वर्षी 20 टक्के याप्रमाणे भरती सुरू आहे. या वर्षी त्याचा हा चौथा टप्पा आहे. सरत्या वर्षाच्या 31 डिसेंबरला सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार या वर्षी सात हजार, 671 पदे भरण्यात येणार आहेत. त्याबरोबरच नवीन बारा पोलिस ठाणी व 32 चौक्‍या व पोलिस दूरक्षेत्रही मंजूर करण्यात आले आहेत. मंजूर करण्यात आलेली पोलिस ठाणी पुढीलप्रमाणे ः मार्केट यार्ड (पुणे शहर), कोनगाव (ठाणे), इंदिरानगर (नाशिक), फलटण ग्रामीण (सातारा), पवार वाडी (नाशिक ग्रामीण), पश्‍चिम देवपूर (धुळे), बेलवंडी (नगर), तळेगाव (वर्धा), गोबरवाही (भंडारा), रावणवाडी (गोंदिया), सरमसपुरा (अमरावती), शेवली (जालना).

याशिवाय 32 पोलिस चौक्‍या व दूरक्षेत्रही मंजूर करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी पोलिस भरती झाली नव्हती. त्यामुळे या वर्षी दोन्ही वर्षांची मिळून भरती होईल. सुमारे 55 वरिष्ठ अधिकारी, 1290 पोलिस अधिकाऱ्यांसह 3604 पोलिस कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. याशिवाय पोलिस दलातील इतर तांत्रिक आणि सहायक पदेही भरण्यात येणार आहेत.


खैरलांजीला पोलिस चौकी
दलित हत्यांकाडामुळे राज्यभर गाजलेल्या खैरलांजी (जि. भंडारा) येथेही पोलिस चौकी मंजूर करण्यात आली आहे. तेथील अंधळगाव पोलिस ठाण्यांतर्गत ही चौकी (पोलिस दूरक्षेत्र) कार्यरत राहणार आहे. त्यामुळे या गावात एका पोलिस अधिकाऱ्यासह मोठा फौजफाटा कायमस्वरूपी राहणार आहे.

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

'
;
/
.lkn

अनामित म्हणाले...

thank