रविवार, ५ फेब्रुवारी, २०१२

ग्रामीण भागातील बॅंका अद्याप असुरक्षितच

ग्रामीण भागापर्यंत बॅंकिंग सेवा पोचली असली, तरी त्यांच्या सुरक्षेसंबंधी करण्यात आलेल्या उपायांना अद्याप तरी यश आलेले नाही. सुरक्षेसाठी "सायरन' आणि "सेन्सर' बसविलेले असूनही तिजोरी कापून पैसे चोरण्याचे प्रकार घडतच आहेत. चोरांनी शोधलेल्या नव्या युक्‍त्यांबरोबरच सुरक्षेसंबंधी दक्षता घेणाऱ्या यंत्रणांचा गाफीलपणाही याला कारणीभूत आहे. सायरन बसविले असले तरी ते वाजल्यावर काय उपाययोजना करायच्या, याबद्दलचे प्रबोधन आणि प्रशिक्षण देण्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही.
जिल्हा सहकारी बॅंकेच्या भांबोरे (ता. कर्जत) येथील शाखेची तिजोरी कापून चोरट्यांनी पाच लाख 98 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. त्यानंतर ग्रामीण बॅंकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा चर्चेत आला. अर्थात, ही काही पहिलीच घटना नाही. जिल्हा सहकारी बॅंकेच्या इतरही शाखांत असे प्रकार घडले असून, काही ठिकाणचे प्रयत्न फसले आहेत. जिल्हा बॅंकेच्या शाखांच्या सुरक्षेसंबंधी पूर्वी अगदीच ढिसाळपणा होता. बहुतांश शाखा असुरक्षित इमारतींत होत्या. अलीकडे बहुतांश ठिकाणी सेवा संस्थांच्या पक्‍क्‍या इमारतींत बॅंका हलविण्यात आल्या आहेत.

सध्याच्या सुरक्षेसंबंधी बॅंकेचे कार्यकारी संचालक के. टी. पावसे म्हणाले, ""जिल्ह्यातील बॅंकेच्या सर्व 282 शाखांमध्ये "सायरन' आणि "सेन्सर' बसविण्यात आले आहेत. केवळ तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्यावरच नव्हे, तर कोणी बळजबरीने बॅंकेत प्रवेश केला तरी सायरन वाजतो. वडगाव पान (ता. संगमनेर) येथील घटनेनंतर सर्व शाखांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे शिरसगाव (ता. नेवासे), साकूर (ता. संगमनेर), दहीगाव (ता. नगर) येथील चोरीचा प्रयत्न फसला.''

आवश्‍यक त्या शाखांमध्ये बंदूकधारी रखवालदार नियुक्त करण्यात आले आहेत. जेथे कायमस्वरूपी रखवालदार नियुक्त करणे शक्‍य नाही, तेथे स्थानिक पातळीवर मानधनावर रखवालदार नियुक्त करण्यात आले आहेत. यापुढील टप्प्यात "सीसीटीव्ही' बसविण्यात येणार असून, सध्या मुख्य शाखेत त्याची चाचणी सुरू आहे, अशी माहिती पावसे यांनी दिली.

बॅंकेने उपाययोजना केल्या असल्या तरी चोऱ्या वा प्रयत्न थांबलेले नाहीत. इमारती आणि तिजोऱ्या मजबूत केल्या तरी त्या "गॅस कटर'च्या साह्याने फोडण्याची युक्ती चोरांनी शोधली आहे. यापूर्वी जिल्हा बॅंकेच्याच जखणगाव, पाथर्डी, ढवळगाव, वडगाव पान आदी शाखांमध्ये अशाप्रकारे चोऱ्या झाल्या. सायरन बसविला म्हणून चोऱ्या थांबतीलच असे नाही. तो वाजल्यावर परिसरातील नागरिकांनी घेतलेली दक्षता, तातडीने उपलब्ध होणारे पोलिस यांच्यावर याचे यश अवलंबून आहे. त्यामुळे सायरन वाजल्यावर काय हालचाली करायच्या, कशी मदत करायची, याचे प्रबोधन करणे आवश्‍यक आहे.

याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश म्हणाले, ""बॅंका पक्‍क्‍या इमारतीत असण्याबरोबरच त्यांची तिजोरीही भक्कम असणे गरजेचे आहे. तिजोरी कापण्याचे प्रकार घडत असल्याने त्या भिंतीत दडलेल्या हव्यात. आवश्‍यतेनुसार बंदूकधारी सुरक्षारक्षकही नियुक्त केले पाहिजेत. सायरन वाजल्यावर तातडीने मदतीला जाऊन पोलिसांनाही कळविले पाहिजे याबद्दल प्रबोधन करण्यावर भर देण्यात येईल.''

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: