रविवार, ३१ मे, २००९

सत्तासंघर्षातून होणारे तंटे अधिक


बहुतांश तंटे हे सत्तासंघर्षातून निर्माण झालेल्या वादाचे, तर उरलेले बांध आणि मालमत्तेच्या संघर्षाचे आहेत. ते सोडविण्यासाठी सध्या सुरू असलेली तंटामुक्त गाव मोहीम हा सरकारी उपक्रम न राहाता लोकचळवळ होण्याची गरज आहे. त्यासाठी गावच्या कारभाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
राज्य सरकारच्या महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे दुसरे वर्ष आता संपत आले आहे. शेताच्या बांधाच्या वादातून पक्के वैरी बनलेले सख्खे भाऊ, शेतीच्या वाटपातून असलेले भावबंदकीतील वाद, किरकोळ कारणातून शेजाऱ्यांतील भांडणे आणि सोसायटी किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून सुरू असलेला वर्षानुवर्षांचा सत्तासंघर्ष ही प्रामुख्याने गावातील तंट्यांची कारणे असल्याचे आढळून येत आहे. हे तंटे मिटविण्यासाठी केवळ समित्यांचे प्रयत्न अपुरे पडणार असून, त्याला प्रशासनाचे सहकार्य आणि राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ आवश्‍यक आहे. कित्येक खटले वर्षानुवर्षे जुने असून, अनेक ठिकाणी काही पिढ्यांची दुश्‍मनी झाल्याची उदाहरणेही यातून पुढे आली आहेत, तर अनेक ठिकाणी पहिल्याच प्रयत्नांत तंटे मिटल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
बहुतांश प्रकरणांत ज्यामुळे तंटा निर्माण झाला, त्यामागे जमीन अथवा जागेच्या वादाचे म्हणजे महसुली तंट्याचे मूळ कारण आहे. एका बाजूला त्यासंबंधीचा दावा सरकारी कार्यालयांत अगर न्यायालयांत सुरू असताना बाहेर मारामारी ते थेट खुनाच्या प्रकारापर्यंतच्या घटना घडलेल्या आहेत आणि हेच तंटे वर्षानुवर्षे सुरू आहेत. महिलांच्या छळाच्या घटनाही आहेत. त्यामध्ये चारित्र्याचा संशय, हुंड्याची मागणी, लग्नातील मानपान आणि मूलबाळ न होणे, या कारणांतून महिलांचे छळ झाल्याची प्रकरणे अधिक आहेत. विशेष म्हणजे या प्रकारांतील तंटे एका गावाशी संबंधित नसून, दोन गावांशी संबंधित आहेत. त्यामुळे सासरच्या गावची आणि माहेरच्या गावच्या समित्यांना एकत्र येऊन असे तंटे मिटवावे लागतील. तंट्यांचे मूळ असलेल्या महसुली आणि राजकीय वादातून तोडगा काढण्यासाठी प्रथम प्रयत्न करावे लागतील.

ग्राम न्यायालयाचा उपाय
समितीच्या निकषानुसार तंटे मिटविण्यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी त्यावर न्यायालयाची "मोहर' लागणे आवश्‍यक असते. मात्र, ही प्रक्रिया वेळ खाऊ आहे. त्यामुळे या मोहिमेला चालना देण्यासाठी गावपातळीवर किंवा किमान तालुकापातळीवर तरी लोकन्यायालये भरविण्याची गरज आहे. विधी सेवा प्राधिकरणाने यासाठी पुढाकार घ्यावा.

रविवार, २४ मे, २००९

तांत्रिकाने भूलविले, घर उद्‌ध्वस्त झाले


पती-पत्नी, तीन गोंडस मुली, एक चुणचुणीत मुलगा. अल्लाहने दिलेले सर्व काही असे भरलेले सुखवस्तू घर! एक तांत्रिक येतो, आपल्या मायाजालात पती-पत्नी अशा दोघांना भूलवतो नि त्यातून हे भरलेले घर उद्‌ध्वस्त होते. एखाद्या रहस्यमय चित्रपटातील कथा वाटावी, अशी भीषण घटना सोलापुरात घडली.
एका तांत्रिकाने शेतात गाडलेले गुप्तधन मिळवून देण्याची थाप मारून घरातील महिलेचा बळी घेतला. सुदैवाने पतीचा बळी घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. बचावलेल्या पतीने दिलेल्या जबानीतून मांत्रिकाच्या क्रूर कुकर्माचा किस्सा पुढे येतो. माझी पत्नी गेली. पण, अल्लाहने मला वाचविले. तसे झाले नसते तर त्या तांत्रिकाचे पातक जगापुढे कधीच आले नसते, असे मुश्‍ताक सय्यद साश्रू नयनाने सांगतात. मीही मेलो असतो तर तांत्रिकाने आमच्या नावाने लिहून ठेवलेली आत्महत्येची चिठ्ठी मिळाली असती आणि लोकांनी त्यावर विश्‍वास ठेवला असता. त्याच्यामुळे आणखी किती कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली असती, कोणास ठाऊक?, असे मुश्‍ताक बोलतात.
मुश्‍ताक सय्यद-इनामदार यांना चार भाऊ. चौघांचा उत्तम चालणारा एकच पारंपरिक व्यवसाय कोंबडीचे मांस व अंडी विकण्याचा. मुश्‍ताक जेमतेम दुसरी शिकलेले. त्यांची पत्नी शाहीन आठवी शिकलेली. चार-एक वर्षांपूर्वी मुश्‍ताक यांचा परिचय स्वतःला मौलाना म्हणवून घेणाऱ्या अब्बास महंमदहनीफ बागवान या तांत्रिकाशी झाला. मुश्‍ताक यांची जुनी मोटार अब्बास तांत्रिकाने विकत घेतली. त्यानंतरच्या संबंधातून तांत्रिक अब्बास मुश्‍ताक यांना त्यांच्या शेतात सोने आहे, असे सांगतो. ते तुमच्याच हक्काचे आहे. ते मी तुम्हाला मिळवून देतो. त्याची विद्या माझ्यापाशी आहे. त्यासाठी काही कर्मकांड करावे लागेल, असे सांगून भूलविले.
"तुमच्या शेतावर गेलो होतो. तेथील थोडी माती आणली आणि त्याचे सोन्याच्या बिस्किटात रूपांतर झाले असून ते पाहण्यासाठी या, असे दूरभाषवरून तांत्रिक अब्बासने मुश्‍ताक यांना सांगितले. महापालिकेजवळ मुश्‍ताक यांना सोन्याचे बिस्कीट दाखविले. अशा प्रकारे अनेकांना सोने मिळवून दिल्याचा त्याचा दावा प्रत्यक्ष बिस्कीट पाहत असल्याने मुश्‍ताक यांना खरा वाटला आणि ते भूलले! या धनाची प्राप्ती करण्यासाठी कुणाकडून काही देणे-घेणे असल्याची माहिती लिहून घ्यावी लागेल, असे अब्बासने सांगितले. त्याप्रमाणे ही माहिती एका कागदावर लिहून घेतली. काही तांत्रिक विद्या पूर्ण करून हे सोने मिळवता येईल. त्यासाठी शेतावर जावे लागेल, असे अब्बासने मुश्‍ताक यांना सांगितले. यावेळी तांत्रिक अब्बासने आपल्या बहिणीला सोबत आणले होते. शेतावर काही कर्मकांड करून तेथे स्टीलचा डबा घेऊन सांगितले, की यात शेतातील सोने जमा झाले आहे. आणखी काही विधी असून ते घरी करावयाचे आहेत. कोणीही पाहू नये म्हणून रात्री उशिरा मी घरी येईन. माझा भाचा मला रिक्षातून थेट दारासमोर आणून सोडेल. घरात लहान मुले नको. त्यांच्यावर काळ्याविद्येचा प्रतिकूल परिणाम होईल. म्हणून त्यांना अन्य कुठेतरी पाठवा, असे अब्बासने सांगितले. त्याप्रमाणे मुश्‍ताक यांनी आपल्या चारही मुलांना भावाकडे पाठविले. घरी पत्नी शाहीन आणि मुश्‍ताक राहिले. मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास अब्बास आला. कपाटातील डबा काढून काही विधी करणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे सफरचंद, केळी, डाळिंब आदी फळांसह, लिंबू, कारले ठेवले. काही मंत्र म्हटल्यासारखे करून हे पुन्हा परत ठेवायला सांगितले. उद्या रात्री पुन्हा येईन, असे सांगून तो गेला. एक सात हात लांब दोरीची व्यवस्था करण्यासाठी सांगितले. दुसऱ्या रात्री दीडच्या सुमारास तांत्रिक अब्बास पुन्हा रिक्षातून
आला. आणखी काही विधी करायचे आहेत असे सांगून पुन्हा डबा, फळे तशीच सजविली. घरात दोन ठिकाणी ती दोरी कापून बांधली. तीन जा-ए-नमाज (नमाज पढण्यासाठी वापरण्यात येणारी लहानशी चादर) तीन ठिकाणी ठेवायला सांगितल्या. तुमच्याकडून जे काही देणे-घेण्याविषयीची माहिती लिहून घेतली आहे; त्या कागदावर तुम्हा दोघांची सही हवी आहे, असे सांगून दोघांच्या सह्या घेतल्या. शाहीन यांचे आठवीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांनी कागद पाहण्यासाठी विचारले असता, ते मंतरलेले असल्याने तुम्हाला पाहता येणार नाही, असे सांगून त्यांना "कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत आहोत' या आशयाच्या चिठ्ठीवर दोघांच्या सह्या घेतल्या आणि तो कागद विधी करण्यासाठी ठेवला. कारल्यावर मंत्र फुंकल्यासारखे केले आणि सांगितले की कारल्याच्या रसासोबत एक औषध घ्यावे लागणार आहे. काळजीचे कारण नाही. पण, औषध कडू लागेल. ते सहन करा. मग तुमचे भले होईल, असे तांत्रिक अब्बासने सांगितले. रात्री कारल्याचे रस काढण्यासाठी मिक्‍सरचा वापर केल्यास लोकांना आवाज जाईल. त्यापेक्षा बत्याचा वापर करा असे सांगून रस काढावयास सांगितले. दोघांवर वेगवेगळ्या ठिकाणी विधी करावे लागणार असल्याने घराच्या आतल्या खोलीत शाहीन यांना जाण्यास सांगितले. त्यानंतर घरातील सर्व दिवे मालवावयास सांगितले. सगळीकडे अंधार झाल्यानंतर त्याने आपल्याकडील विषारी द्रव मिसळून मुश्‍ताक यांना कारल्याचा रस दिला. रस पिताच मुश्‍ताक यांना गुंगी आली आणि ते बेशुद्ध पडले. डोळे उघडले ते थेट दवाखान्यातच. त्यामुळे आपल्या पत्नी सोबत काय प्रसंग गुदरला याची माहिती मुश्‍ताक यांना नाही. 22 एप्रिल रोजी हा प्रसंग घडला.
23 एप्रिल रोजी पहाटे मुश्‍ताक यांच्या नातेवाइकांना दोरीला लटकलेल्या स्थितीत शाहीनचा मृतदेह दिसला. संपूर्ण इनामदार कुटुंबीयांवर दुःखाची दाट सावली पसरली. मुश्‍ताक यांना उपचारासाठी इस्पितळात नेण्यात आले. तेथे ते जवळपास वीस दिवस बेशुद्ध अवस्थेत होते. शुद्धीवर आल्यानंतर तांत्रिकाची हकिगत सगळ्यांना समजली.
(esakal)

बुधवार, २० मे, २००९

वर्षभर तुरुंगवासनंतर लग्नाची बेडी


प्रेयसीवर ऍसिड फेकल्याच्या प्रकरणात न्यायालयाने प्रियकरला दोषी धरले. पण मधल्या काळात न्यायालयाच्याच सूचनेनुसार त्या दोघांनी लग्नही केले होते. त्यामुळे न्यायालयानेही सामाजिक दृष्टीकोन ठेवून त्याला एक वर्षे तुरुंगावासाची शिक्षा दिली. ही शिक्षा त्याने आधीच भोगलीही आहे. त्यामुळे त्याच्या हातातील कायद्याची बेडी आता निघणार असून "लग्नाच्या बेडी'चे कर्तव्य निभावण्यासाठी तो मोकळा झाला आहे.
जवळा (ता. पारनेर) येथील हे प्रकरण आहे. मनोहर रामचंद्र बरसिले (वय 21) याचे त्याच गावातील एका मुलीवर प्रेम होते. त्याने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली; पण तिने आपला विचार झाला नसल्याचे आणि आई-वडिलांना विचारल्याशिवाय निर्णय घेणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्याने रागाच्या भारात मध्यरात्री घराबाहेर झोपलेल्या त्या मुलीच्या तोंडावर ऍसिड फेकले. यामध्ये त्याला अटक झाली. त्याच्याविरूद्धचा खटल्याची सुनावणी येथील जिल्हा न्यायाधीश रमेश कदम यांच्यासमोर त्याची सुनावणी झाली. मधल्या काळात दोन्ही कुटुंबांचे आणि गावकऱ्यांचेही मत बदलले होते. खटला चालवून शिक्षा देण्यापेक्षा दोघांचे लग्न लावून देण्याचा विचार पुढे आला. दोन्ही कुटुंबांना तो मान्य झाला. सरकारी वकील ऍड. सतीश पाटील यांना याबद्दल माहिती देण्यात आली. त्यांनीही सहकार्याची भूमिका घेऊन न्यायालयास विनंती केली; पण आधी लग्न करावे आणि नंतरच खटल्याचा काय तो निर्णय घ्यावा, असे ठरले. त्यानुसार लग्नासाठी म्हणून मनोहरला पंधरा दिवसांसाठी जामिनावर सोडण्यात आले. नुकतेच त्यांनी लग्न केले. तो पुन्हा तुरुंगात गेला आणि खटल्याचे कामकाज सुरू झाले.
आज या खटल्याचा निकाल देण्यात आला. समोर आलेल्या साक्षीपुराव्यावरून न्यायालयाने आरोपी मनोहर याला दोषी धरले. यामध्ये दहा वर्षांपर्यंत शिक्षेची तरतुद आहे. मात्र, शिक्षेबद्दल युक्तिवाद करताना आरोपीने आपण या मुलीशी न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे विवाह केला असून तिचा योग्य पद्धतीने सांभाळ करणार असल्याचे आरोपीने सांगितले. शिवाय तिच्यावर प्लॉस्टीक सर्जरीद्वारे उपचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा आधार घेत आरोपीला एक वर्ष तुरुंगवास व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा दिली. अटक झाल्यापासून म्हणजे सुमारे वर्षभर आरोपी तुरुंगातच आहे. त्यामुळे हा काळ शिक्षेतून वजा केल्यास त्याची शिक्षा भोगून झाली असून उद्याच त्याची तुरुंगातून सुटका होणार आहे.

शिक्षा आणि न्यायही!
न्यायनिर्णयात न्यायाधीशांनी म्हटले आहे की, आरोपी दोषी आढळल्याने त्याला शिक्षा देणे क्रमप्राप्त आहे. गुन्हा केल्यावर शिक्षा होते, हा संदेश समाजात जायला हवा. मात्र, त्याला शिक्षा दिल्याने त्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्‍न सुटला नसता. आरोपीने फिर्यादी मुलीशी लग्न केल्याने सामाजिक दृष्टीकोन ठेवत शिक्षा कमी करण्यात आली आहे. आरोपीला शिक्षा आणि फिर्यादीचेही पुनर्वसन असा हा न्यायनिवाडा आहे.

बुधवार, १३ मे, २००९

पुन्हा एकदा "ड्रॉप'!


स्वस्तात सोने देऊन लुटण्याच्या घटना आता काही नवीन राहिल्या नाहीत. तरीही लोक त्याला बळी पडतात. ज्यांच्याशी पुरती ओळखही नाही, अशा लोकांवर विश्‍वास ठेवून आडरानात लाखो रुपये घेऊन लोक जातातच कसे? याचे आश्‍चर्य वाटते. नगर जिल्ह्यातील काही तालुक्‍यांमध्ये अशा घटना वारंवार घडतात. प्रसारमाध्यमांमुळे ही माहिती आता राज्यभर पसरली आहे. तरीही शहरी आणि सुशिक्षित लोक अशा लुटमारीचे बळी ठरतात हीही खेदाचीच गोष्टी आहे. झटपट श्रीमंत होण्याचा मोहच त्यांना यासाठी प्रवृत्त करतो, असेच म्हणावे लागेल.
शेवगाव तालुक्‍यात पुन्हा एकदा अशी घटना घडली आहे. स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून, मुंबई येथील पाच जणांना जबर मारहाण करून त्यांच्याकडील तीन लाख बत्तीस हजारांची रक्कम व इतर साहित्य दरोडेखोरांनी हिसकावून घेतले. ही घटना शेवगाव-पैठण राज्यमार्गापासून जवळच असलेल्या खानापूर ते घारी दहिगाव रस्त्यावर भर दुपारी दोनच्या सुमारास घडली. मुंबई येथील संदीप मधुकर घारे यांना एका मध्यस्थाने "स्वस्तात सोने देतो,' असे आमिष दाखवून घटनास्थळी बोलावून घेतले. मध्यस्थ घारे यांचे मित्र शेषराव गंगाराम इंगळे यांच्याकडे कामाला होता. त्याचे पूर्ण नाव कोणालाही माहीत नव्हते; मात्र विश्‍वास बसावा म्हणून त्याने काही दिवसांपूर्वी त्यांना सोन्याचा छोटासा तुकडा दाखविला व आमच्या भागात आल्यानंतर अत्यंत स्वस्त भावात हे सोने देऊ, असे सांगितले. त्याच्यावर लगेचच विश्‍वास ठेवून स्वस्तातील सोने खरेदी करण्यासाठी संदीप मधुकर घारे, शेषराव गंगाराम इंगळे, नीलेश श्रीकांत लोखंडे, अर्जुन उमरजी डोके (सर्व रा. चारकोप, मुंबई) व प्रदीप सूर्यकांत घाणेकर (रा. सांताक्रूझ, मुंबई) हे पाच जण एमएच-02 एल-5751 या क्रमांकाच्या मारुती मोटारीतून खानापूर शिवारात आले.
दोन मध्यस्थांनी या पाच जणांना आडरस्त्याला असलेल्या एका शेताच्या शिवारात नेले. त्यांनी रक्कम काढताच शेजारील शेतात उसात लपून बसलेल्या दहा ते बारा जणांनी येऊन तीन लाख बत्तीस हजारांची रक्कम व त्यांच्याकडील मोबाईल संच हिसकावून घेतले. शिवाय या पाच जणांना बेदम मारहाणही केली. जवळचे पैसे तर गेलेच, पण मार खाण्याचीही वेळ त्यांच्यावर आली. अशा घटनांच्या बातम्या वृत्तपत्रांतून वारंवार येत असतात. तरीही लोक याला फसतातच. यामागे संबंधित गुन्हेगारांचे कौशल्य आणि त्यावर विश्‍वास ठेवणाऱ्या लोकांचा भाबडेपणाही कारणीभूत असावा.

सोमवार, ११ मे, २००९

लग्नाच्या बेडीसाठी ....!

त्याचं तिच्यावर प्रेम होतं. एक दिवशी त्यानं थेट मागणीच घातली; पण तिचा विचार झाला नव्हता. त्यामुळे चिडलेल्या त्याने सरळ तिच्या तोंडावर ऍसिड फेकले. परिणामी त्याच्या हातात पोलिसांची बेडी पडली. वर्षभरानंतर दोन्ही कुटुंबांचा विचार बदलला. त्या दोघांचे लग्न लावून द्यायचे ठरले. तशी विनंती न्यायालयाला करण्यात आली. न्यायालयानेही सामाजिक दृष्टिकोन ठेवत कायद्याचा फास सैल केला.......

मनोहर रामचंद्र बरसिले याचे त्याच गावातील (जवळा, ता. पारनेर) एका मुलीवर प्रेम होते. 17 एप्रिल 2008 रोजी तो त्या मुलीच्या घरी गेला. त्याने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली; पण तिने आपला विचार झाला नसल्याचे आणि आई-वडिलांना विचारल्याशिवाय निर्णय घेण्यास तिने असमर्थता व्यक्त केली. हा तिचा नकारच समजून मनोहरला संताप आला. ती जर आपली होणार नसेल, तर इतर कोणाचीही होऊ देणार नाही, असा विचारही त्याच्या डोक्‍यात आला. तशी त्याने योजना आखली. 20 एप्रिलच्या मध्यरात्री घराबाहेर झोपलेल्या त्या मुलीच्या तोंडावर ऍसिड फेकले आणि पळून गेला. जखमी अवस्थेत मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांनी ती बरी झाली, पण चेहरा कायमचा विद्रूप झाला.
दुसऱ्या दिवशी या प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. घटना घडल्यानंतर मनोहरला पश्‍चात्ताप झाला. त्यामुळे त्याने कुरुंद गावात विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन-चार दिवसांत तो बरा झाल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला. तेव्हापासून तो तुरुंगातच आहे. नगरचे जिल्हा न्यायाधीश रमेश कदम यांच्यासमोर त्याची सुनावणी सुरू झाली. डिसेंबर 2008 पासून साक्षी नोंदविण्यास सुरवात झाली. फिर्यादी मुलीनेही न डगमगता साक्ष दिली. तोपर्यंत दोन्ही कुटुंबांचे आणि गावकऱ्यांचेही मत बदलले होते. चेहरा विद्रूप झालेल्या या मुलीशी कोण लग्न करणार? असाही प्रश्‍न होताच. या कृत्याबद्दल मनोहरला शिक्षा व्हावी, हा विचार समर्थनीय असला तरी त्याला शिक्षा होऊन या मुलीच्या आयुष्यात काही फरक पडणार नव्हता. ही गोष्ट दोन्ही बाजूंच्या लोकांना पटली होती. त्यामुळे खटला चालवून शिक्षा देण्यापेक्षा दोघांचे लग्न लावून देण्याचा विचार पुढे आला. दोन्ही कुटुंबांना तो मान्य झाला. सरकारी वकील ऍड. सतीश पाटील यांना याबद्दल माहिती देण्यात आली. त्यांनीही सहकार्याची भूमिका घेऊन न्यायालयास विनंती केली; पण आधी लग्न करावे आणि नंतरच खटल्याचा काय तो निर्णय घ्यावा, असे ठरले. त्यानुसार लग्नासाठी म्हणून मनोहरचा जामीन अर्ज करण्यात आला. न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला. त्याला पंधरा दिवसांसाठी जामिनावर सोडण्यात आले आहे. 16 मे रोजी त्याने पुन्हा न्यायालयात हजर व्हायचे आहे.
मधल्या काळात मुलीवर पुण्यातील रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. ऍसिड फेकल्याने खराब झालेल्या तिच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. त्याचा खर्चही मनोहरच्या कुटुंबीयांनीच केला. आता पंधरा दिवसांत चांगला मुहूर्त पाहून या दोघांचा विवाह लावण्यात येणार आहे. त्यासाठी दोन्ही घरी धावपळ सुरू झाली आहे. मनोहरची आई म्हणते "मला मुलगी नाही, सुनेलाच मी मुलीसारखी वागणूक देईल.'' मुलीची आई म्हणते, "झाले गेले आम्ही विसरून गेलो आहेत, मुलीचे भावी आयुष्य चांगले जावे हीच अपेक्षा आहे.' सरकारी वकील म्हणतात, "कायद्याच्या चौकटीत राहूनच या दोघांनाही न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. एखादे कुटुंब उभा राहत असेल तर त्याला मदत केलीच पाहिजे, हाच खरा न्याय यंत्रणेचा हेतू आहे.'
आधी पोलिसांच्या बेडीत अडकलेला मनोहर आता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्यासाठीच कायद्याचा फासही सैल करण्यात आला असला, तरी मूळ खटल्याचा निकाल मात्र अद्याप लागायचा आहे. मे महिन्याच्या अखेरीस मूळ खटल्याचा निकाल दिला जाणार आहे.

बुधवार, ६ मे, २००९

मंगळसूत्रांची चोरी ः समस्या व उपाय


अलीकडील काळात वर्तमानपत्रांमध्ये अनेक गावांमध्ये मंगळसूत्र चोरीच्या बातम्या नेहमी वाचण्यात येतात. महिलांच्या दृष्टीने ही एक गंभीर समस्या होऊन बसली आहे. एक काळजीचा सामाजिक प्रश्‍न या नजरेने या घटनांकडे पाहिले पाहिजे. पूर्वी काठीला सोने बांधून लोक काशीयात्रेला जात होते; पण आता समाज व नैतिक अधिष्ठाने घसरत चाललेली आहेत. बदलता काळ- नवीन आव्हाने या दृष्टीने पारंपरिक मूल्ये-दृष्टिकोन यामध्ये बदल होणे आवश्‍यक आहे.
साधारणपणे पहाटे व सायंकाळी फिरावयास जाणाऱ्या महिला किंवा अन्य कामांसाठी किरकोळ खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या महिला. या वेळी रस्त्यावर वाहने किंवा माणसांची गर्दी नसते. एकाकी किंवा सुनाटीच्या रस्त्यावर मंगळसूत्र चोरीचे प्रमाण जास्त आढळते. प्रौढ व वयोवृद्ध महिला त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्रे, त्यांचे जाण्या-येण्याचे रस्ते याचे बारकाईने निरीक्षण करून मंगळसूत्र चोर मोटारसायकलवरून "धूम स्टाईल'ने वेगाने येऊन गळ्यातील मंगळसूत्र खेचतात व क्षणार्धात पळून जातात. जेथे वस्ती विरळ आहे अशा भागामध्ये अशा चोऱ्यांचे प्रमाण जास्त आढळते.
काही उपाय ः जास्त ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र वापरण्याचा महिलांनी अट्टहास धरू नये. परिस्थितीनुसार पारंपरिक दृष्टिकोनात बदल करावा. सौभाग्यमणी असलेली सुंदर डिझाईनची काळी पोत वापरावी. मंगळसूत्र माळ समोर न ठेवता ब्लाऊज किंवा पदराच्या, ओढणीच्या आत ठेवावी. महिला मंडळे, भिशी मंडळे, भजनी मंडळे, बचत गट, तसेच महिलांचे इतर विविध गट यांमध्ये या समस्येवर चर्चा घडवून आणून या चोऱ्याच होऊच नयेत, म्हणून महिलांना जागृत करून विविध उपाय योजना करावी.
जास्त गर्दीची ठिकाणे उदा. गणपतीची आरास, नवरात्रोत्सव, देवदर्शन, यात्रा, प्रवास, प्रदर्शने, मिरवणुका आदी ठिकाणी खोटे मंगळसूत्र वापरणे, तसेच सावधतेने फिरणे आवश्‍यक आहे.
पोलिसांवर सध्याच विविध कामांचा, प्रश्‍नांचा खूप ताण आहे. त्यामध्ये महिलांनीच जर या समस्येबाबत खबरदारी घेतली, तर पोलिसांवरचा कामाचा ताण कमी होईल व अप्रत्यक्षपणे यामुळे पोलिसांना सहकार्य केल्याचे उदाहरण घडेल.
कुटुंबातील व्यक्तींनी कष्टाने मिळविलेल्या पैशांची बचत करून हौसेने केलेले सुंदर डिझाईनचे मंगळसूत्र चोरीस गेल्यास ती महिला व कुटुंबीय यांना जो मानसिक, आर्थिक धक्का बसतो, त्यामुळे अशी घटना घडणे फार वाईट आहे.
मंगळसूत्र हे मांगल्य, पावित्र्यदर्शक, सौभाग्य अलंकार आहे. महिलांच्या दृष्टीने त्याचे सांस्कृतिक मूल्य मोठे आहे. सध्याच्या धोकादायक परिस्थितीत आपल्या पारंपरिक दृष्टिकोनात थोडासा बदल करून नवीन आव्हान स्वीकारावे लागेल. ही गोष्ट सर्व समाज व महिलांच्या दृष्टीने फायद्याची व सद्यपरिस्थितीवर मात करण्यासाठी योग्य ठरेल, असे वाटते. तसेच महिलांमध्ये स्वसंरक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी सर्व महिला गटांनी प्रयत्न करणे आज गरजेचे आहे.

रविवार, ३ मे, २००९

नागरी अधिकारांच्या संरक्षणासंबंधीचा कायदा

\कायद्याचा उद्देश:
भारतीय संविधानाने अस्पृष्यतेची प्रथा नष्ट केली, त्याचा मागोवा घेण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे.

कायद्यात नमूद अपराध:
कोणत्याही शैक्षणिक संस्थामध्ये वा देवस्थानामध्ये प्रार्थनेसाठी अस्पृष्यतेच्या वा जातीच्या आधारे प्रवेश नाकारणे.
अस्पृष्यतेच्या वा जातीच्या आधारे दुकाने, उपहारगृहे, सार्वजनिक मनोरंजनाची स्थळे, सार्वजनिक धर्मशाळा, स्मशानभूमि, नदी, घाट, पाण्याची टाकी, तलाव, रस्ता इत्यादी ठिकाणी प्रवेश नाकारणे.
जातीच्या आधारे नोकरी वा व्यवसायासाठी अडथळा आणणे.
अस्पृष्यतेच्या आधारावर कुठल्याही दवाखान्यात ऑडमिट न करून घेणे.
अस्पृष्यतेमुळे एखादी वस्तू विकण्यावर बंदी टाकणे.
अस्पृष्यतेच्या/जातीच्या आधारे शिवीगाळ करणे, छळ करणे, अपमान करणे.
अस्पृष्यतेच्या आधारे भेदभाव करुन ह्या समाजाच्या व्यक्तीकडून सक्तीने भंगीकाम, मेलेल्या जनावरांची विल्हेवाट लावणे, किंवा मेलेल्या जनावरांच्या कातडीपासून चामडी तयार करण्याची कामे करून घेणे.

शिक्षा:
वरीलपैकी कोणत्याही अपराधासाठी संबंधित व्यक्तीला प्रथम वेळेस सहा महिनेपर्यंत कैद व रु.५०० पर्यंत दंड होऊ शकतो. परत अपराध केल्यास १ वर्षापर्यंत कैद व ५०० रुपये दंड व तिसर्‍या वेळेस व परतच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी दोन वर्षापर्यंत कैद व १ हजार रुपयापर्यंत दंड होऊ शकतो.

विशेष:
या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी कोर्ट फी लागत नाही.
जी व्यक्ती स्वत: एखादा व्यवसाय करते वा माल विकते पण अस्पृष्यतेच्या आधारे दुसर्‍यास तोच माल विकण्यास वा व्यवसाय करण्यास अडथळा आणते, तिचा व्यवसाय परवाना रद्द होऊ शकतो.
'महान्यूज'