सोमवार, ३० मे, २०११

गुन्हेगारांवर पोलिसांच्या दंडुक्याचा धाक हवाच...

गुन्हेगारांवर पोलिसांच्या दंडुक्याचा धाक हवाच..

प्रदीर्घ आणि क्लिष्ट न्याय प्रक्रियेमुळे शास्त्रीय पद्धतीने तपास करूनही आरोपींना शिक्षा होतेच असे नाही. अशा परिस्थितीत केवळ कायद्याचे धाकाने गुन्हेगारी नियंत्रित ठेवता येणे कठीण आहे. त्यामुळे पोलिसांच्या दंडुक्यांचा धाक हवाच. अशा प्रतिक्रिया बहुतांश पोलिस अधिकारयांनी व्यक्त केल्या आहेत. विश्रामबाग पोलिस ठाण्यातील थर्ड डिग्री प्रकरण उघडकीस आल्यानंतर या विषयावर सध्या विविध बाजूंनी चर्चा सुरू आहे. त्यासंबंधी घेतलेला हा आढावा. (कृपया लिंकवर क्लीक करून सकाळच्या पानावर जावे.)

गुरुवार, १९ मे, २०११

खोपडेंनी पुस्तकातूनही केला वरिष्ठ वर्दीवर हल्ला

पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेबद्दल आयुक्तांना पत्र लिहून त्याची जाहीर वाच्यता करणारे विशेष पोलिस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांनी त्यांच्या पुस्तकातही इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या धोरणांवर टीका केली आहे. मुंबईचे तत्कालीन आयुक्त हसन गफूर, डी. एन. जाधव, ए. एन. रॉय यांचा नावासह उल्लेख करीत, तर महासंचालक डॉ. ओ. पी. बाली, डॉ. पी. एस. पसरिचा यांच्या कार्यकाळाचा उल्लेख करून त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले आहेत.
वरिष्ठांच्या बैठकांमधील चर्चा आणि पोलिस दलातील इतर अनेक गोष्टीही त्यांनी यातून चव्हाट्यावर आणल्या आहेत. त्यांनी स्वतः केलेले प्रयोग कसे बरोबर आहेत, हे स्पष्ट करून सध्याची पद्धत कालबाह्य झाल्याचे म्हटले आहे.

श्री. खोपडे यांनी लिहिलेल्या 'मुंबई जळाली, भिवंडी का नाही?' या पुस्तकाचे आधी मुंबईत आणि आता पुण्यात प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन कार्यक्रमात बोलताना खोपडे यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी राबविलेल्या उपक्रमांवर टीका केली होती. ज्या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्या पुस्तकातही इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या धोरणांवर टीका आहे. काही ठिकाणी नावांसह, तर काही ठिकाणी नाव टाळून त्यांनी ही विधाने केली आहेत. पोलिस दलाच्या कामकाजात सुधारणा करण्याविषयी 2003 मध्ये पोलिस महासंचालकांना दिलेले पत्र आणि त्यावर आलेले त्यांचे उत्तरही पुस्तकात जसेच्या तसे छापण्यात आले आहे. (त्या वेळी ओ. पी. बाली महासंचालक होते.) खोपडे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी सुचविलेले उपाय गरजेनुसार राबविले जात असल्याचे सांगून पुन्हा असे निरुपयोगी पत्र पाठवू नये, अशी तंबीच तत्कालीन महासंचालकांनी खोपडे यांना दिली होती.

त्यानंतर पुन्हा 2006 मधील महासंचालकांच्या एका बैठकीतील प्रकारही त्यांनी पुस्तकात नमूद केला आहे. (त्या वेळी डॉ. पी. एस. पसरिचा हे महासंचालक होते आणि ए. एन. रॉय मुंबईचे पोलिस आयुक्त होते). जुलै 2006 मध्ये रेल्वे बॉंबस्फोटानंतर तत्कालीन पंतप्रधान मुंबई भेटीवर आले होते. त्यांनी महासंचालक, मुंबईचे पोलिस आयुक्त आणि रेल्वेचे पोलिस आयुक्त असलेले खोपडे यांची बैठक बोलाविली. बैठकीत अजिबात बोलू नये, अशी तंबी महासंचालकांनी बैठकीआधी आपल्याला दिल्याचे खोपडे यांनी पुस्तकात म्हटले आहे. त्याचे कारण सांगताना त्यांनी म्हटले आहे की, दादर रेल्वे स्थानकावर एका परदेशी व्यक्तीच्या वस्तू चोरण्यावरून सुरक्षा दलाचे महासंचालक आणि पोलिस महासंचालक यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे पोलिस महासंचालकांनी रेल्वे फलाटावर कोणत्याही प्रवाशाची तपासणी न करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे तपासणी बंद करण्यात आली होती आणि त्यानंतर दोनच दिवसांनी रेल्वेत बॉंबस्फोट झाला होता. ही गोष्ट आपण पंतप्रधानांना सांगू की काय, या शक्‍यतेमुळे महासंचालकांनी गप्प राहण्याची तंबी दिली होती. त्याच बैठकीच्या संदर्भाने मुंबई पोलिस आयुक्तांबद्दलही पुस्तकात विधाने आहेत. खोपडे यांनी सुरू केलेल्या मोहल्ला कमिट्या तत्कालीन आयुक्तांनी बंद केल्या होत्या. त्यामुळे पोलिसांचा जनतेशी संपर्क दुरावला होता. पंतप्रधानांनी उपाययोजनांबद्दल विचारले, तेव्हा आयुक्तांनी या उपाययोजना सुरूच असल्याचे त्यांना खोटेच सांगितले होते, असा उल्लेख करून खोपडे म्हणतात, "देशाच्या प्रमुखापुढे खोटे बोलणारा वरिष्ठ नोकरशहा किती आत्मकेंद्री व अहंकारी आहे, याची प्रचिती आली.'

मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त जाधव आणि हसन गफूर यांच्याबद्दलही पुस्तकात उल्लेख आहे. या दोघांनी आपल्याला पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत अपमानित करून आपला सुधारणा प्रकल्प बंद करण्यास सांगितले होते. त्यासंबंधी एक लेखी पत्रही आपल्याला देण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी पुस्तकात केला आहे. 26 नोव्हेंबर 2008 मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासंबंधीही हसन गफूर यांच्या कार्यपद्धतीवर शंका घेणारी विधाने केली आहेत. हल्ला झाला तेव्हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचे दल असलेल्या मुंबई पोलिसांचे नेते काय करीत होते, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.


कोणाबद्दल काय?
- माजी महासंचालक ओ. पी. बाली - मुंबईतील बॉंबस्फोट कसे थांबविता येतील, याच्या सूचना करणारे पत्र दिले, तर महासंचालकांनी लेखी पत्र देऊन माझा आवाज बंद केला. (दोन्ही पत्रे जशीच्या तशी छापण्यात आली आहेत.)

- माजी महासंचालक डॉ. पी. एस. पसरिचा - रेल्वे प्रवाशांची तपासणी बंद करण्याचे आदेश दिले अन्‌ त्यानंतरच बॉंबस्फोट झाले, ही गोष्ट पंतप्रधानांना सांगू नये, यासाठी तंबी दिली.

- माजी मुंबई पोलिस आयुक्त ए. एन. रॉय - मोहल्ला कमिटीचा उपक्रम बंद करायला लावला. शिवाय पंतप्रधानांच्या बैठकीत तो सुरूच असल्याबद्दल खोटेच सांगितले.

- माजी मुंबई पोलिस आयुक्त हसन गफूर - नॉर्थ रिजन मुंबई हा प्रयोग बंद करायला सांगितला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मला एकट्याला उभे केले आणि प्रश्‍न विचारून अपमानित केले. 26 नोव्हेंबर हल्ल्याच्या वेळी मुंबईत पोलिसांचे हे नेते कोठे गेले होते?



सुधारणांची पद्धत चुकीची

पोलिस दलात सुधारणांसाठी मॅकेंझी कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. खोपडे यांनी त्याबाबतही प्रतिकूल मते व्यक्त केली आहेत. पोलिसांचे सध्याचे ब्रीदवाक्‍यही निरर्थक ठरत असून, पोलिस दलात हिंदुधर्मातील वर्णाश्रम पद्धतीची उतरंड असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. हे सर्व सांगताना आपण केलेले आणि सुचवत असलेले प्रयोग योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.  (सकाळ)

रविवार, १५ मे, २०११

"ई-मेल'द्वारे फसवणूक ़ नायजेरियन युवकाला अटक

तुमचा ई-मेल ऍड्रेस "लकी ड्रॉ'मध्ये निवडला गेला आहे. तुम्हाला पाच लाख अमेरिकी डॉलर आणि टोयोटा कार बक्षीस लागली... असे आमिष दाखवून एन-5 औरंगाबाद, येथील एका व्यक्‍तीला पाच लाख रुपयांना गंडवण्याची घटना ता.3 मे रोजी घडली होती. सिडको पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेने या घटनेचा तपास करीत एका नायजेरियन युवकाला मुंबईत अटक केली.


सिडको एन-5 भागातील अविनाश कंठे (वय 49, रा. सह्याद्रीनगर) यांना मागील महिन्यात त्यांच्या मेल आयडीवर चीनवरून टोयोटा कंपनीतर्फे एक ई-मेल आला होता. त्यात त्यांना त्यांचा ई-मेल आयडी लकी ड्रॉमध्ये निवडण्यात आल्याचा उल्लेख होता. श्री. कंठेंना पाच लाख अमेरिकी डॉलर आणि टोयोटा कार लागल्याचेही या मेलमध्ये लिहिलेले होते. बक्षीस लागल्याच्या आमिषाला भुलून कंठे यांनी ई-मेलला प्रतिसाद दिला. या वेळी त्यांच्याशी आरोपी डॉ. मार्क विल्यम, अजयकुमार दास, पंकजकुमार झा, काशी सुरेश पांडे, चंचलकुमार, स्नूक स्मिथ, डॅन कॉग; तसेच मुंबई येथील "रिद्धी-सिद्धी क्रिएशन' आणि पेवारस मेगा सेलच्या संचालकांनी वारंवार फोन; तसेच ई-मेलवर संपर्क साधला. आरोपींनी बक्षीस मिळवण्यासाठी त्यांना वेळोवेळी डॉ. मार्क विल्यमच्या बॅंक खात्यात पाच लाख 520 रुपये रक्कम भरावयाला लावली होती. ही रक्कम भरल्यानंतर आरोपी डॉ. मार्क याने शहरात येऊन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कंठेंची भेट घेतली. कंठेंना एक सीलबंद बॉक्‍स देत त्याने या बॉक्‍समध्ये पाच लाख अमेरिकी डॉलर असल्याचे सांगितले. मात्र, या नोटा मूळ रूपात आणावयाच्या असल्यास मुंबई येथून एक रसायन मागवावे लागेल, असे सांगत हे रसायन आणण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली.

श्री. कंठेंनी दीड लाख देण्यास नकार दिल्यामुळे भामटा डॉ. मार्क निघून गेला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे श्री. कंठेंनी सिडको पोलिस ठाण्यात नऊ आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, आरोपींनी श्री. कंठेंना फोन करून पोलिसांत न जाण्याच्या धमक्‍या दिल्या होत्या. फरार डॉ. मार्क विल्यम हा मुंबई येथे वसई भागात असल्याची माहिती मोबाईल लोकेशनवरून पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस पथकाने मु ंबई येथून आरोपी डॉ. मार्क विल्यम ऊर्फ अली इब्राहिम शेहयू या नायजेरियन युवकाला  अटक केली.


पंचतारांकित हॉटेलची चौकशी करणार
आरोपी डॉ. मार्क विल्यम हा औरंगाबादला आल्यानंतर जालना रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरला होता. नियमानुसार हॉटेल व्यवस्थापनाने पोलिसांना विदेशी नागरिक हॉटेलमध्ये उतरल्यास माहिती देणे गरजेचे होते. मात्र ही माहिती हॉटेल व्यवस्थापनाने दिली नसल्यामुळे या पंचतारांकित हॉटेलची चौकशी करण्यात येणार असून, इतर फरार आरोपींचा शोध घेण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी या वेळी सांगितले.

रविवार, ८ मे, २०११

पोलिस ठाण्यांच्या निर्मितीसाठी नियमावली

राज्यात नवीन पोलिस ठाणी निर्माण करण्यासाठी काय निकष असावेत, याची नियमावलीच उपलब्ध नव्हती. आता मात्र अभ्यास समितीच्या शिफारशींचा विचार करून सरकारने अठरा निकष ठरविले आहेत. त्यामुळे केवळ राजकीय अट्टहासामुळे पोलिस ठाणे निर्माण होण्याचे अगर गरज असूनही मागणीकडे दुर्लक्ष होण्याचे प्रकार टळू शकतील.
राज्य सरकारच्या 1960 मधील अध्यादेशानुसार नवीन पोलिस ठाणे निर्माण करताना पोलिस महासंचालकांकडून अभिप्राय मागविला जातो. मात्र, त्यासाठी काय निकष लावले जावेत, याचे काहीच नियम नव्हते. त्यामुळे यावर अभ्यास करून नियमावली ठरविण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली होती. शिवाय केंद्र सरकारनेही कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जास्तीत जास्त पोलिस ठाणी असावीत, अशा सूचना केल्या आहेत.

या सर्वांचा विचार करण्यासाठी गृहविभागाचे प्रधान सचिव प्रवीण दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली मार्च महिन्यात अभ्यास समितीची बैठक झाली. त्या समितीने सुचविलेल्यांपैकी 18 निकष सरकारने मान्य केले आहेत. यापुढे नवीन पोलिस ठाणे निर्माण करताना त्यांचा विचार केला जाणार आहे.

असे आहेत निकष

1. नवीन तालुके निर्मिती झालेल्या ठिकाणी, 2. अति महत्त्वाच्या व्यक्तींची ठिकाणे राहण्याची ठिकाणे, 3. वाढते औद्योगीकरण व "एसईझेड'च्या ठिकाणी व मोठ्या निवासी कॉम्प्लेक्‍सच्या दोन किलो मीटर परिघात, 4. वाहनांची मोठी संख्या व अपघातांचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी, 5. जेथे जास्त वीज चोरी आढळते तेथे, 6. सामाजिक अत्याचाराचे गुन्हे जास्त घडतात, त्या भागात, 7. व्यसनाधीनता व अमलीपदार्थ विक्री जेथे जास्त होते, त्या भागात, 8. शरीराविरुद्धचे व संपत्तीविषयक गुन्हे जेथे जास्त होतात तेथे, 9. आर्थिक गुन्हे जास्त होणारा परिसर, 10. सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणी असलेला परिसर, उदा. न्यायालये, शाळा, मोठी धरणे, मोठी क्रीडा संकुले अशा ठिकाणी, 11. लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या, तसेच पर्यटनस्थळामुळे गर्दी होणाऱ्या ठिकाणी, 12. सायबर गुन्हे जास्त व वारंवार घडणाऱ्या ठिकाणी, 13. सरकारी जागेवर अतिक्रमणे जेथे होतात तेथे, 14. ग्रामीण भागात दोन पोलिस ठाण्यांचे अंतर दहा किलोमीटरपेक्षा तर शहरी भागात चार किलोमीटरपेक्षा जास्त नसावे, 15. मोठी देवस्थाने, प्रार्थनास्थळे किंवा जेथे मोठ्या यात्रा व मेळावे भरतात तेथे, 16. बाजारपेठा व आठवडे बाजार ज्या ठिकाणी भरतात अशा जागी स्वतंत्र पोलिस ठाणे असावे, असे निकष ठरविण्यात आले आहेत.


पदनिर्मितीची पद्धत जुनीच

पोलिस ठाण्यांसाठी पदनिर्मितीची पद्धत मात्र 1960 मधील नियमानुसारच ठेवण्यात आली आहे. नवीन गरज लक्षात घेऊन त्यामध्येही बदल करून पोलिसांची संख्या वाढविण्याची गरज आहे. अस्तित्वात असलेल्या पोलिस ठाण्यांसाठीच मनुष्यबळ कमी आहे. नवी पोलिस ठाणी वेगाने निर्माण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रियाही राबवावी लागेल.                                   (सकाळ)

गुरुवार, ५ मे, २०११

सुट्या पैशांच्या बहाण्याने गुरूजींना फसविले

सुटे पैसे देण्याची माणुसकी दाखविली खरी; परंतु हाती ढबूही पडला नाही. त्यामुळे डोक्‍याला हात लावण्याची वेळ कोल्हारमधील (जि. नगर) एका गुरुजींवर आली. सुटे पैसे मागण्याचा बहाणा करून त्यांना नगरमध्ये अगदी भरदुपारी एका लबाडाने सहा हजार रुपयांना सहजपणे गंडविले.

बाळासाहेब यशवंत गांगर्डे असे फसविले गेलेल्या गुरुजींचे नाव असून, ते कोल्हार खुर्द (ता. राहुरी) येथील पाटीलवाडी शाळेत नोकरीस आहेत. उसने पैसे घेऊन गृहकर्जाचा हप्ता भरण्यासाठी ते नगरला गेले होते. युनियन बॅंकेच्या सावेडी शाखेत त्यांना पैसे भरावयाचे होते. बॅंकेजवळ स्प्लेंडर मोटारसायकलवरून आलेल्या भामट्याने गुरुजींना रामराम घातला. त्याच्याकडे पाहून क्षणभर बुचकळ्यात पडलेल्या गुरुजींना थोडाही विचार करू न देता तो म्हणाला, "मला ओळखले नाही? माझे नाव भाऊसाहेब खर्डे. मी तुमच्याच गावचे (कोल्हार) शंकरनाना खर्डेंचा पुतण्या.' नानांचे नाव सांगितल्यामुळे गुरुजींची झाली पंचाईत. तरीही गुरुजींनी स्वतःजवळ पैसे नसल्याचे सांगितले. त्यावर भामटा म्हणाला, "तुमच्या पॅंटच्या खिशात असतील तेवढे सुटे पैसे द्या. मी बंधे देतो.' गुरुजींनी त्याला खिशातील सहा हजार रुपये दिले. भामटा म्हणाला, "चला माझ्याबरोबर. घरून बंधे पैसे देतो.' त्याच्या ताब्यात पैसे गेले असल्यामुळे गुरुजींना निमूटपणे त्याच्या मोटारसायकलवर बसणे भाग पडले.

भामट्याने जवळच असलेल्या सावेडीतील एका बंगल्यासमोर गुरुजींना नेले. बंगल्याच्या दरवाजासमोर उभा राहून "पप्पू दरवाजा उघड' अशी हाक भामट्याने मारली; मात्र दरवाजा उघडला गेला नाही. तोपर्यंत "गाडी सावलीत लावतो' असे सांगून भामटा सटकला... तो मोटारसायकलवरून पाइपलाइन रस्त्याकडे सुसाट निघूनही गेला. गुरुजींनी हा प्रकार कोल्हारचे अभियंते शिरीष भीमाशंकर खर्डे यांना सांगितला व शंकरनानांचा कोणी पुतण्या नगरला आहे काय, याची चौकशी केली; मात्र नगरला नानांचे कोणीच नातलग नसल्याचे शिरीष यांनी सांगितले. त्यावर एकाने आपल्याला सहा हजारांना गंडविल्याचे गुरुजींच्या लक्षात आले. बॅंकेचा हप्ता भरावयास गेलेले गुरुजी हात हलवीत कोल्हारला परतले.

त्या लबाडाच्या  हाती पैसे देण्यापूर्वीच गुरुजींनी शिरीष खर्डे यांच्याकडे चौकशी केली असती, तर कदाचित डोक्‍याला हात लावण्याची वेळ आली नसती, असे पश्‍चातसल्ले मात्र गुरुजींना मिळू लागले आहेत.                                                                                                                                     (सकाळ)