बुधवार, २१ सप्टेंबर, २०११

तेव्हा न्यूज चॅनेल असते तर...

गेल्या आठवड्यात दिल्ली, सिक्कीम आणि मराठवाड्याच्या काही भागात भूकंप झाला. विविध वृत्त वाहिन्यांवरून त्यांची दृश्य पाहताना १९९३ मध्ये किल्लारी भागात झालेल्या भूकंपाची आणि पानशेत धरण फुटीचीही आठवण झाली. त्यावेळी वृत्त वाहिन्यांचा एवढा प्रसार झालेला नव्हता. तेव्हा या वाहिन्या असत्या तर...????

एक वृत्त वाहिनी ः

ब्रेकिंग न्यूज... पानशेतचे धरण फुटले, पुण्याला धोका.( धरण फुटत असल्याची दृश्य)...

वृत्तनिवेदक ः पुणेकरांंसाठी एक भंयंकर बातमी. पानशेतचे धरण फुटले आहे. पाण्याचा मोठा लोंढा पुण्याच्या दिशेने निघाला आहे. त्याची ही दृष्य फक्त आमच्या वाहिनीवरून दाखविण्यात येत आहेत. आमचा प्रतिनिधी आता घटनास्थळी उपस्थित आहे. थेट जाऊया त्याच्याकडे... अजय धरण फुटल्याची बातमी आपण सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांंना देत आहोत. आता यावेळी तेथे काय सुरू आहे, तू काय सांगशील..

अजय ः नक्कीच प्रसाद, ही बातमी सर्वप्रथम आपणच देत आहोत. येथील दृश्य सुद्धा आपण दाखवत आहोत. आता येवळी धरणाच्या भिंतीला मोठे भगदाड पडलेले असून त्यातून वेगाने पाणी बाहेर पडत आहे. काही वेळातच धरण रिकामे होईल. अशी स्थिती आहे. प्रसाद....

वृत्तनिवेदक ः धन्यवाद अजय या माहितीबद्दल. धरणातून पाणी बाहेर पडले असून कोणत्याही क्षणी ते पुण्यात पोहचू शकते. त्याच्या बातम्या आपण पाहणार आहोत. आमचे प्रतिनिधी ठिकठिकाणाहून आपल्याला ताजी माहिती देणार आहेत. आता घेत आहोत एक छोटासा ब्रेक. तोपर्ंयत आपण कोठेही जाऊ नका पाहत राहा......


१० मिनिटांच्या जाहिराती.

वृत्त निवेदक ः आता आपण थेट जाणार आहोत पुण्याच्या लकडी पुलावर तेथे आमची प्रतिनिधी श्वेता उपस्थित आहे... श्वेता आता तेथे काय परिस्थिती आहे. पाणी पोचले आहे का.

श्वेता ः प्रसाद आता मी लकडी पुलावर उभी आहे. पाण्याचा पहिला लोंढा येथे नुकताच दाखल झाला आहे. आता आपण जी दृष्य पाहतो आहोत, ती पाण्याचा पहिल्या लोंढ्यांची आहेत. काही वेळात हे पाणी पुलाला टेकण्याची शक्यता आहे. येथे पूर पाहण्यासाठी काही नागरिक जमले आहेत. आपण त्यांनाच विचारू काय वाटते ते...

पहिला नागरिक ः एवढा मोठा पूर कधीच पाहिला नव्हता. पण हे धरण कसे फुटले याची चाैकशी होण्याची गरज आहे.

एक महिला ः धरण फुटल्याचे कळाल्यावर आम्ही पूर पाहण्यासाठी येथे आलो आहोत. प्रथमच एवढे पाणी पाहिले. आपल्या वाहिनीला धन्यवाद.

श्वेता ः प्रसाद, या होत्या काही नागरिकांच्या प्रतिक्रिया. आता पाणी पुलावर चढले आहे. पुलावरून कमरे एवढ्या उंंचीचे पाणी वाहत असून काही घरेही पाण्याखाली गेल्याचे येथून दिसते आहे. प्रसाद....

वृत्त निवेदक ः नक्कीच श्वेता नागरिकांच्या भावना संंतप्त आहेत. धरण कसे फुटले हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊ या धरण कसे फुटले ते. सोबत काही तज्ज्ञांना आपण येथे चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. त्यांच्याकडूनही आपण अधिक माहिती घेणार आहोत. या चर्चेत सरकारचे प्रतिनिधी म्हणून काही अधिकारयांना आपण येथे येण्याची विनंती केली होती. मदत मदत कार्याचे कारण पुढे करीत त्यांनी येथे येण्याचे टाळले. त्यावरून धरण कसे फुटले, याबद्दल सरकारला गांभीर्य नाही, हेच यावरून दिसते. आपण चर्चा सुरूच ठेवणार आहोत. सोबतच आपल्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींकडून ताजी माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी प्रेक्षकांंच्या माहितीसाठी पुन्हा एकदा आठवण करून देतो, आज सकाळी पानशेत धरण फुटले असून पुण्यात महापूर आला आहे. ही ब्रेकिंग न्यूज सर्वप्रथम आमच्या वृत्त वाहिनीनी दाखविली आहे. या बातमीसोबत आपण कायम राहणार आहोत. येथे एक छोटासा ब्रेक घेत आहोत, तो पर्यंत आपण कोठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त...



दुसरी वृत्त वाहिनी


धरण फुटीमुळे पुण्यात हाहाकार.. महाभयंकर महापूर....


वृत्तनिवेदक ः पुण्यातील महापुराची लाईव्ह दृष्य आम्ही आपणाला दाखवित आहोत. अर्धे शहर पाण्याखाली गेले असून हजारो नागरिक वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुणेकरांंवर हे संकट आले आहे. शनिवार पेठेतील एका वाड्यात काही महिला अडकून पडल्या आहेत. आमची प्रतिनिधी तेथे पोचली असून आपण थेट तेथील माहिती जाणून घेऊ या. .... प्रतिमा, माझा आवाज तुला एेकू येतो आहे का? आता तेथे काय परिस्थिती आहे?

प्रतिमा ः नक्कीच सारंग, मी आता या वाड्यात उभी आहे. या वाड्याला चारही बाजूंनी पाण्याचे घेरले आहे. दहा महिला येथे अडकून पडल्या असून त्या वरच्या माळ्यावर जीव मुठीत धरून बसल्या आहेत. आतापर्ंयत सरकारचा एकही प्रतिनिधी येथे पोचला नाही. सर्वात आधी आपला कॅमेरा येथे पोचला आहे. आपण थेट त्या महिलांनाच विचारू या त्यांची काय प्रतिक्रिया आहे..... आजी, तुम्हाला कसं वाटतय.

आजी ः सकाळी सकाळीच पाणी घरात घुसले, आम्ही खूप घाबरलो, जीव वाचविण्यासाठी येथे येऊन बसलो आहोत. आता काय होणार माहिती नाही.


प्रतिमा ः कोणी सरकारी अधिकारी तुम्हाला मदत करायला आले होते का?

आजी ः अद्याप कोणीच आलं नाही. आमच्या घरातले इतर लोक कोठे गेले माहिती नाही. आम्ही खूप घाबरलो आहोत.


प्रतिमा ः आताच आपण या आजींची प्रतिक्रिया एेकली. शहरात महापुराने हाहाकार माजविला असताना सरकार झोपले आहे. आतापर्ंयत या महिलांपर्ं.त कोणतीही मदत पोचलेले नाही. त्यांच्या घरातील इतर सदस्य कोठे गेले, हेही त्यांना ठावूक नाही, कदाचित ते या महापुराचे बळीही ठरले असावेत. पण आपले सरकार किती संवदेनशून्य आहे. याची प्रचिती आली. घटनास्थळी सर्वप्रथम आमचा कॅमरा पोहचला. त्यामुळे त्या महिल्यांच्या समस्यांना वाचा फुटली... सारंग.

सारंग ः नक्कीच प्रतिमा, आपण सर्वप्रथम ही दृष्य दाखवित आहोत. महापुराचे लोक कसे बळी जात आहेत, हे आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवित आहोत. ताज्या माहितीसह पुन्हा काही वेळात येत आहोत. तोपर्यत तुम्ही कोठेही जाऊ नका पाहत रहा फक्त........

रविवार, १८ सप्टेंबर, २०११

पोलिसांचे दुर्लक्ष अन्‌ तो बनला अतिरेकी

 मुलाचे रात्री अपरात्री घरी येणे, वाईट मित्रांची संगत, घरातील व्यक्तींना दिली जाणारी दुरुत्तरे यावरून आपला मुलगा वाईट मार्गाला लागला आहे, हे पित्याने ओळखले. त्यावर गप्प न बसता त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यासाठी सतत चार वर्षे पाठपुरावा केला... पण अशा विनंत्या ऐकतील ते पोलिस कसले. शेवटी व्हायचे तेच झाले, त्यांचा मुलगा छोटा राजनच्या हस्तकांच्या टोळीत सहभागी झाला.

सुरेंद्र बहादूरसिंग पुरोहित याला छोटा राजनच्या हस्तकांसमवेत पोलिसांनी अटक केल्याचे कळाले आणि पिता बहादूरसिंग व्यथित झाले. एवढा पाठपुरावा करूनही पोलिसांनी लक्ष घातले नाही, त्यामुळे मुलगा बिघडला आणि आता समाज आपल्याकडे या अशा मुलाचा बाप म्हणून बोट दाखविणार याचे त्यांना जास्त वाईट वाटते. बहादूरसिंग भोपालसिंग पुरोहित (वय 58) यांचे नागपूर चाळ येथे मेहता ज्वेलर्स नावाचे छोटेसे ज्वेलरी दुकान आहे. बाजारपेठेत आणि समाजातही त्यांचे चांगले नाव आहे. खासगी नोकरी करता करता त्यांनी मोठ्या कष्टातून आपला व्यवसाय उभा केला. दोन मुलींचे विवाह झाले. आणखी एक मुलगी शिक्षण घेत आहे; पण दुःख एवढेच की मुलगा दिवटा निघाला. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्याच्या स्वैरपणाला लगाम घालण्यासाठी त्यांनी त्याचाही विवाह करून दिला. घरी पत्नी आल्यावर तो सुधारेल, संसाराला लागेल, अशी त्यांची अपेक्षा; पण तीही व्यर्थ ठरली.

त्याचा वावर सतत गुंड प्रवृत्तीच्या मित्रांबरोबर असायचा. त्यांच्यासोबतच तो जास्त काळ फिरायचा. काय करतो, कोठे जातो, याची माहिती तो घरी देत नसे. कोणी विचारले तर त्यांच्या अंगावर धावून जात असे. मुलगा आणखी बिघडू नये, यासाठी मन घट्ट करून बहादूरसिंग यांनी त्याच्याबद्दल आणि त्याच्या मित्रांबद्दल पोलिसांना माहिती दिली. एकदा, दोनदा नव्हे, तीन चार वर्षे ते सतत पोलिसांना याबद्दल विनवत होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी पोलिस आयुक्तांचीही भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले होते. आपला मुलगा आणि त्याचे मित्र यांची चौकशी करावी, त्यांना वेळीच आवर घालून अतिरेकी बनण्यापासून रोखावे, अशी मागणी त्यांनी केली होती. आपण एवढे प्रयत्न करूनही त्याला रोखू शकलो नाही. याची खंत आता पुरोहित कुटुबींयाना आहे. पोलिस आणि नशिबाला दोष देत समाजाची समजूत काढण्याशिवाय त्यांच्यापुढे आता पर्याय राहिला नाही.


आणि त्याचे धाडस वाढले....

एका पित्याची ही कैफियत पोलिसांना कळालीच नाही. स्वतःच्या मुलाला पाठीशी घालण्यासाठी पोलिसांकडे येणारे पिता अनेक असतील, पण मुलाच्या दुष्कृत्यांबद्दल माहिती देण्यासाठी पुढे आलेल्या पित्यालाही बेदखल करण्यात आले. खुद्द आपल्या पित्यानेच तक्रार केली तरी पोलिस काही करीत नाहीत, हे कळाल्यावर मुलाचे धैर्य वाढत गेले आणि तो गुन्हेगार बनला.                        (सकाळ)

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०११

पुण्याचा गणेशोत्सव अडकला मानपान आणि शोबाजीत

लोकमान्य टिळकांनी सुरवात केलेल्या पुण्यातील गणेशोत्सावाबद्दल राज्यभरातील नव्हे तर राज्याबाहेर आणि सातासमुद्रापारही आकर्षण आहे. मलाही याबद्दल आकर्षण होते. यावर्षी पुण्यातील गणेशोत्सव जवळून पाहण्याचा योग आला. माझ्या कल्पनेपेक्षा तो खूपच वेगळा वाटला. एका वाक्यात सांगायचे झाले तर हा उत्सव मानपान आणि शोबाजीत अडकलेला दिसून आला. ज्या मंडळांना संधी मिळतेय ते शोबाजी करतायत आणि ज्यांना उत्सव करायचाय त्यांना संधी मिळत नाही, असे चित्र पहायला मिळाले. येथील नागरिक म्हणतात बदलत्या पुण्याबरोबर उत्सव बदलला, तेही खरे आहे. चोखंदळ पुणेकरांनी हा बदल कसा काय स्वीकारला? की त्यांचीही या बदलाला संमती आहे, हे मा्त्र कळत नाही.

शहरात सुमारे साडेतीन हजार मंडळांकडून उत्सव साजरा केला जातो. त्यातील साडेपाचशेच्या आसपास मंडळे मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. ही मिरवणूक पंचवीस ते तीस तास चालते. विशेष म्हणजे मिरवणुकीत सकाळी पाच आणि सायंकाळी पाच अशा दहा मंडळांचा मान आहे. ही मंडळे गेल्याशिवाय इतरांना मार्गावर संधी नाही. या मंडळांना मिरवणुकीसाठी चाैदा ते पंधरा तास लागतात. उरलेल्या वेळात इतर मंडळांची मिरवणूक चालते.

जी अवस्था मिरवणुकीची तीच एकूण उत्सवाची आहे. प्रमुख आठ-दहा मंडळांभोवतीच उत्सव फिरतो. आणि हा उत्सव म्हणजे तरी काय तर केवळ शोबाजी. शिवाय गणेशोत्सवाच्या जोडीने सुरू झालेले इतर उत्सवही आता मागे पडू लागले आहेत. देखाव्यांमध्येही समाजप्रबोधन, नवा विचार, कल्पकता यांचा फारसा विचार केलेला दिसत नाही. मोठी मंडळे किती महागडा देखावा केला यावर भर देतात, तर छोटी मंडळे मिळालेल्या वर्गणीत मिरवणुकीसाठी मोठा पैसा मागे ठेवून उरलेल्यांत बाकीचा खर्च भागवितात. मोजकीच मंडळे याला अपवाद ठरतील.

विसर्जन मिरवणूकही आनंददायी ठरण्यापेक्षा नागरिकांना त्रासदायकच वाटू लागली आहे. मंडळाचे कार्यकर्तेच नव्हे तर मिरवणूक पाहायला येणारे कित्येक जण तर्रर असतात. एक इव्हेंट म्हणूच याकडे पाहिले जाते. त्यामुळे कंपन्या जाहिरातींसाठी आणि नागरिक एन्जाॅय करण्यासाठी या उत्सवाकडे पाहू लागले आहेत. त्यामुळे त्यातील पावित्र्य आणि् उत्सवीस्वरुप जाऊन त्याला बाजारी स्वरूप आले आहे.

वाढते शहरीकरण आणि दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर या उत्सवावर आता बंधनेही तेवढीच येऊ लागली आहेत. त्यामुळे उत्सव पोलिसांच्या ताब्यात गेल्याचेच दिसते. उत्सवाचे नियम पोलिस तयार करतात. प्रत्येक ठिकाणी उत्सवापेक्षा सुरक्षा महत्त्वाची असे सांगत अनेक बंधने लादली जातात. त्यामुळे एकूणच प्रशासन आणि सामान्यांच्या दृष्टीने हा उत्सव दहशतीच्या वातावरणातच पार पडतो. लोकांनी एकत्र यावे, विचारांची देवाणघेवाण करावी, त्यातून नवे काही तरी केले जावे हा या उत्सवाचा उद्देश होता. ती गरज आजही संपलेली नाही. पुणे वाढत असले तरी त्याच्या नियोजनाची गरज आहे. हे नियोजन लोकांच्या अशा एकत्र येण्यातूनच होणार आहे. पण हे एकत्र येणे केवळ उत्सव किंवा इव्हेंट ठरू नये. उत्सवातून आनंद मिळालाच पाहिजे, याबद्दल दुमत नाही. पण या उत्सवाचा मूळ उद्देशही विसरता कामा नये, किमान पुण्यात तरी.