गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२

जातीयवादाची विषवल्ली वेळीच उखडली पाहिजे

जातीय तणाव निर्माण होण्याचे प्रकार प्रशासन आणि पोलिस यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे नगर जिल्ह्यात जवळजवळ थांबले होते. आता मात्र अशा घटना, त्यासाठी होणारे प्रयत्न पुन्हा डोके वर काढू लागले आहेत. जुन्याच पद्धतीने जातीय तणाव निर्माण करण्यासाठी धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करताना दिसत आहेत. अर्थात, त्यांच्या या प्रयत्नांना फारसे यश आलेले नाही; पण ही जातीय तेढ निर्माण करणारी विषवल्ली वेळीच नष्ट केली पाहिजे.
जामखेडमध्ये आठ दिवसांत अशा दोन घटना घडल्या. जिल्हा परिषद निवडणूक मतदानाच्या आदल्या दिवशीच हा प्रकार करून कोणी राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत होते काय, याची उकल होण्याआधीच पुन्हा तशाच प्रकारची घटना घडली. अर्थात, हे प्रकारही अचानक घडलेले नाहीत. केवळ जामखेडच नव्हे, तर नेवासे, श्रीरामपूर, संगमनेर येथे गेल्या काही दिवसांपासून बेबनावाच्या घटना धुमसत आहेत, तर काही थोड्या-फार प्रमाणात बाहेरही आल्या. खरे तर अशा घटनांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. त्यांची कारणे शोधून त्यावर वेळीच उपाय केले पाहिजेत. हे काम पोलिस, प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे आहे. सध्या मात्र हे तिन्ही घटक समाजापासून दुरावत चालल्याचे दिसते.

अशा घटनांवर लक्ष ठेवून त्याची पूर्वकल्पना देण्यासाठी पोलिसांची एक विशेष शाखा कार्यरत असते. त्यांना या हालचालींची वेळीच चाहूल लागणे आणि तातडीने उपाय करणे अपेक्षित असते. मात्र, एकूणच पोलिस समाजापासून दुरावत चालले आहेत. त्यामुळे समाजात घडणाऱ्या हालचालींची खरी माहिती पोलिसांपर्यंत येत नाही. माहिती आली, तरी ती सोयीस्कररीत्या पसरविलेली असते. अशा माहितीची खातरजमा करण्यासाठी विश्‍वासार्ह स्रोतही पोलिसांकडे नसतो. जी कोणी मंडळी असे काम करण्यास तयार असतात, त्यांच्यापर्यंत पोलिस पोचत नाहीत. "चमकोगिरी' करणारेच पोलिसांच्या आजूबाजूला वावरत असतात. आपले महत्त्व वाढविणारी आणि विरोधकांना त्रासदायक ठरतील अशीच माहिती ही मंडळी पोलिसांपर्यंत पोचवितात. अर्थात, अशा "चमकोगिरी' करणाऱ्यांना समाजातही थारा नसतो. त्यामुळे समाजाचे खरे प्रतिबिंब त्यांच्या माहितीतही दिसत नाही.

जातीय तणाव निर्माणच होऊ नयेत, यासाठी प्रशासनाला एक कार्यक्रम आखून दिलेला आहे. त्याची अंमलबजावणीसुद्धा अभावानेच झाल्याचे दिसून येते. सरकारी योजना आणि नागरिकांच्या मदतीने राबविण्याचे हे कार्यक्रम आहेत. त्यामध्ये नगरचा समावेश अग्रक्रमाने केलेला असला, तरी गेल्या काही वर्षांपासून ही योजना गुंडाळून ठेवल्याचे दिसते. यामध्ये नागरिकांचा समावेश करण्याचे ठरविले, तरी अशा घटनांच्या वेळी ज्यांचे ऐकले जाईल, अशा जाणत्या मंडळींचेही प्रमाण कमी होत आहे. पूर्वी पोलिसांच्या लाठीपेक्षा समाजातील काही कार्यकर्त्यांच्या शब्दांवर वाद मिटल्याची उदाहरणे आहेत. आता अशी मंडळीही दुरापास्त झाली आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात जातीय विषवल्ली पसरविण्याचे काम पुन्हा सुरू झाले आहे.

असे प्रकार करणारे कोण आहेत, यामागे डोके कोणाचे, हात कोणाचे, त्याची कारणे काय, हे तपासात उघड होईलच. जातीय दंगल घडवून राजकीय पोळी भाजणे, कोणा अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्याची बदली व्हावी यासाठी असे प्रकार घडविणे, जातीवर आधारित व्यावसायिक अगर इतर प्रकारची स्पर्धा, या कारणांवरूनही असे प्रकार झाल्याची पूर्वीची उदाहरणे आहेत. मात्र, यामध्ये नुकसान सर्वांचेच असते, हे सर्वांनीच ध्यानात घेतले पाहिजे. त्यावरूनच अशा गोष्टींना किती थारा द्यायचा, ते आपले आपण ठरवावे.

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

मुस्लीमाना दंगंली सुरू करू द्यायच्या आणि हिंदू प्रतिकार करावयास लागल्यावर दंगलखोरांची गय करणार नाही अशी भूमिका घेण्याचे सरकारने सोडल्यावरच जातीयवादाची विषवल्ली नष्ट होऊ शकते.