बुधवार, १८ जानेवारी, २०१२

बिहारी गुंडगिरीवर मराठी "सिंघम'चा वचक !

पोलिस खात्यातील नोकरीच्या निमित्ताने बिहारमध्ये गेलेल्या एका वैदर्भीय आयपीएस अधिकाऱ्याने बिहारमध्ये आपल्या मराठी बाण्याने तेथील तरुणाईची मने जिंकली आहेत. राजधानी पाटणामध्ये दहा महिने शब्दशः राज्य केलेल्या या अधिकाऱ्याची बदली होताच तेथील तमाम तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. मोर्चे, रास्ता रोको आणि त्याही पुढे जाऊन पंधरा डिसेंबरला बंदही पुकारण्यात आला आहे. एरवी बिहार आणि महाराष्ट्रामधील संबंधांचा राजकारण्याकडून होणारा वापर पाहता एका मराठी अधिकाऱ्यासाठी बिहारींचा हा पवित्रा विशेष ठरतो.
शिवदीप वामन लांडे असे या मराठी आयपीएस अधिकाऱ्याचे नाव. विदर्भातील अकोला जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या लांडे यांनी परिस्थितीवर मात करून शिक्षण पूर्ण केले. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाल्यावर बिहार केडर मिळाले. तेही त्यांनी आनंदाने स्वीकारले. बिहारच्या नक्षली भागात प्रशिक्षण आणि पर्यवेक्षाधीन कालावधी पूर्ण केला. या कालावधीतील त्यांच्या कामाचा धडाका पाहून मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सूचनेवरूनच त्यांना राजधानी पाटण्यात आणण्यात आले.

कारवाईचा धडाका

पाटण्यात आल्यावर त्यांच्याकडे शहराचे अधीक्षक म्हणून सूत्रे देण्यात आली. त्यानंतर वाहतूक आणि गुन्हे शाखेचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे देण्यात आला. एका अर्थाने पाटण्याचे ते सर्वेसर्वा पोलिस अधिकारी बनले. मुख्यमंत्र्यांचाच वरदहस्त मिळाल्याने आपला मराठी बाणा दाखवत त्यांनी कामाला सुरवात केली. गुंडगिरी, बेकायदा व्यवसाय, बेशिस्त वाहतूक, टपोरेगिरी याविरुद्ध त्यांनी धडक मोहीम सुरू केली. त्यांच्या या कामगिरीचे केवळ नागरिकच नव्हे, तर सर्वपक्षीय नेत्यांकडूनही कौतुक होऊ लागले. लालू प्रसाद यादव आणि रामविलास पासवान यांनीही अनेकदा त्यांच्या कामाचे कौतुक केले. तेथील प्रसिद्धिमाध्यमांमध्ये दररोज लांडे यांचेच नाव झळकत राहिले. तरुणाईने त्यांना डोक्‍यावर घेतले. मात्र, मध्ये कोठे तरी माशी शिंकली. कदाचित बिहारी राजकारण्यांना लांडे यांच्या कामाची आणि भविष्यातील आपल्या प्रतिमेची काळजी वाटली असावी. एकेदिवशी सायंकाळी अचानक राज्याच्या पोलिस महासंचालकांनी लांडे यांना बोलावून घेतले आणि बदलीचा आदेश हातात ठेवला. त्यांची बदली पाटण्यापासून दूर सीमावर्ती भागात करण्यात आली. लांडे यांनी हे आव्हानही स्वीकारले. ते लगेचच बदलीच्या ठिकाणी जाऊन हजरही झाले.


बदलीविरोधात आंदोलने

इकडे जेव्हा त्यांच्या बदलीची बातमी समजली, तेव्हा तरुणाई रस्त्यावर उतरली. आंदोलने सुरू झाली. लांडे यांची बदली रद्द करावी, या मागणीवर तरुणाई ठाम आहे. यासाठी 15 डिसेंबरला सर्व शिक्षण संस्था बंद ठेवण्यात येणार आहेत. एका मराठी अधिकाऱ्यासाठी बिहारमध्ये प्रथमच अशी आंदोलने झाली.

"सकाळ'ने लांडे यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, ""बिहारमध्ये नियुक्ती झाल्यावर आपण एक आव्हान म्हणून ते स्वीकारले आहे. मराठी माणूस प्रामाणिक, कष्टाळू आणि बाणेदार असतो, हे आपण बिहारच्या जनतेला दाखवून देऊ शकलो, याचे समाधान आहे. मराठी माणसाला बिहारमध्ये एक वेगळी ओळख करून दिली. सीमावर्ती भागात बदली झाली असली तरी न डगमगता काम करणार आहे. मुख्यमंत्र्यांशी आपले चांगले संबंध होते. त्यांनी कित्येकदा घरी बोलावले. अनेक धोरणात्मक निर्णयांमध्ये आपल्याला सहभागी करून घेत ती धोरणे राबविली. असे असूनही मध्येच बदली का झाली, हे आपल्यालाही कळले नाही.''


कोण आहेत लांडे?

लांडे मूळचे अकोला जिल्ह्यातील. गावी सात एकर कोरडवाहू शेती आहे. आई-वडील सातवीपर्यंत शिकलेले. भावंडेही जेमतेम शिकलेली. ते सर्वजण गावी शेती करतात. लांडे 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी. गावापासून दूर राहूनही गावाशी नाळ जोडलेली. गावातील युवक संघटनांना त्याचा मोठा आधार आहे. संघटनांच्या उपक्रमाला ते आर्थिक मदतही करतात. नक्षली भागात काम करताना त्यांच्यावर तीन वेळा हल्ला झाला. एका स्फोटातून ते थोडक्‍यात बचावले. लहानपणासून संघर्षमय जीवन आणि आर्थिक ओढाताण सोसलेले असूनही पैशापेक्षा कर्तव्याला प्राधान्य देण्याची मानसिकता, आई-वडिलांचे संस्कार आणि परिस्थितीतून आल्याचे ते सांगतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: