बुधवार, २१ सप्टेंबर, २०११

तेव्हा न्यूज चॅनेल असते तर...

गेल्या आठवड्यात दिल्ली, सिक्कीम आणि मराठवाड्याच्या काही भागात भूकंप झाला. विविध वृत्त वाहिन्यांवरून त्यांची दृश्य पाहताना १९९३ मध्ये किल्लारी भागात झालेल्या भूकंपाची आणि पानशेत धरण फुटीचीही आठवण झाली. त्यावेळी वृत्त वाहिन्यांचा एवढा प्रसार झालेला नव्हता. तेव्हा या वाहिन्या असत्या तर...????

एक वृत्त वाहिनी ः

ब्रेकिंग न्यूज... पानशेतचे धरण फुटले, पुण्याला धोका.( धरण फुटत असल्याची दृश्य)...

वृत्तनिवेदक ः पुणेकरांंसाठी एक भंयंकर बातमी. पानशेतचे धरण फुटले आहे. पाण्याचा मोठा लोंढा पुण्याच्या दिशेने निघाला आहे. त्याची ही दृष्य फक्त आमच्या वाहिनीवरून दाखविण्यात येत आहेत. आमचा प्रतिनिधी आता घटनास्थळी उपस्थित आहे. थेट जाऊया त्याच्याकडे... अजय धरण फुटल्याची बातमी आपण सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांंना देत आहोत. आता यावेळी तेथे काय सुरू आहे, तू काय सांगशील..

अजय ः नक्कीच प्रसाद, ही बातमी सर्वप्रथम आपणच देत आहोत. येथील दृश्य सुद्धा आपण दाखवत आहोत. आता येवळी धरणाच्या भिंतीला मोठे भगदाड पडलेले असून त्यातून वेगाने पाणी बाहेर पडत आहे. काही वेळातच धरण रिकामे होईल. अशी स्थिती आहे. प्रसाद....

वृत्तनिवेदक ः धन्यवाद अजय या माहितीबद्दल. धरणातून पाणी बाहेर पडले असून कोणत्याही क्षणी ते पुण्यात पोहचू शकते. त्याच्या बातम्या आपण पाहणार आहोत. आमचे प्रतिनिधी ठिकठिकाणाहून आपल्याला ताजी माहिती देणार आहेत. आता घेत आहोत एक छोटासा ब्रेक. तोपर्ंयत आपण कोठेही जाऊ नका पाहत राहा......


१० मिनिटांच्या जाहिराती.

वृत्त निवेदक ः आता आपण थेट जाणार आहोत पुण्याच्या लकडी पुलावर तेथे आमची प्रतिनिधी श्वेता उपस्थित आहे... श्वेता आता तेथे काय परिस्थिती आहे. पाणी पोचले आहे का.

श्वेता ः प्रसाद आता मी लकडी पुलावर उभी आहे. पाण्याचा पहिला लोंढा येथे नुकताच दाखल झाला आहे. आता आपण जी दृष्य पाहतो आहोत, ती पाण्याचा पहिल्या लोंढ्यांची आहेत. काही वेळात हे पाणी पुलाला टेकण्याची शक्यता आहे. येथे पूर पाहण्यासाठी काही नागरिक जमले आहेत. आपण त्यांनाच विचारू काय वाटते ते...

पहिला नागरिक ः एवढा मोठा पूर कधीच पाहिला नव्हता. पण हे धरण कसे फुटले याची चाैकशी होण्याची गरज आहे.

एक महिला ः धरण फुटल्याचे कळाल्यावर आम्ही पूर पाहण्यासाठी येथे आलो आहोत. प्रथमच एवढे पाणी पाहिले. आपल्या वाहिनीला धन्यवाद.

श्वेता ः प्रसाद, या होत्या काही नागरिकांच्या प्रतिक्रिया. आता पाणी पुलावर चढले आहे. पुलावरून कमरे एवढ्या उंंचीचे पाणी वाहत असून काही घरेही पाण्याखाली गेल्याचे येथून दिसते आहे. प्रसाद....

वृत्त निवेदक ः नक्कीच श्वेता नागरिकांच्या भावना संंतप्त आहेत. धरण कसे फुटले हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊ या धरण कसे फुटले ते. सोबत काही तज्ज्ञांना आपण येथे चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. त्यांच्याकडूनही आपण अधिक माहिती घेणार आहोत. या चर्चेत सरकारचे प्रतिनिधी म्हणून काही अधिकारयांना आपण येथे येण्याची विनंती केली होती. मदत मदत कार्याचे कारण पुढे करीत त्यांनी येथे येण्याचे टाळले. त्यावरून धरण कसे फुटले, याबद्दल सरकारला गांभीर्य नाही, हेच यावरून दिसते. आपण चर्चा सुरूच ठेवणार आहोत. सोबतच आपल्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींकडून ताजी माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी प्रेक्षकांंच्या माहितीसाठी पुन्हा एकदा आठवण करून देतो, आज सकाळी पानशेत धरण फुटले असून पुण्यात महापूर आला आहे. ही ब्रेकिंग न्यूज सर्वप्रथम आमच्या वृत्त वाहिनीनी दाखविली आहे. या बातमीसोबत आपण कायम राहणार आहोत. येथे एक छोटासा ब्रेक घेत आहोत, तो पर्यंत आपण कोठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त...



दुसरी वृत्त वाहिनी


धरण फुटीमुळे पुण्यात हाहाकार.. महाभयंकर महापूर....


वृत्तनिवेदक ः पुण्यातील महापुराची लाईव्ह दृष्य आम्ही आपणाला दाखवित आहोत. अर्धे शहर पाण्याखाली गेले असून हजारो नागरिक वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुणेकरांंवर हे संकट आले आहे. शनिवार पेठेतील एका वाड्यात काही महिला अडकून पडल्या आहेत. आमची प्रतिनिधी तेथे पोचली असून आपण थेट तेथील माहिती जाणून घेऊ या. .... प्रतिमा, माझा आवाज तुला एेकू येतो आहे का? आता तेथे काय परिस्थिती आहे?

प्रतिमा ः नक्कीच सारंग, मी आता या वाड्यात उभी आहे. या वाड्याला चारही बाजूंनी पाण्याचे घेरले आहे. दहा महिला येथे अडकून पडल्या असून त्या वरच्या माळ्यावर जीव मुठीत धरून बसल्या आहेत. आतापर्ंयत सरकारचा एकही प्रतिनिधी येथे पोचला नाही. सर्वात आधी आपला कॅमेरा येथे पोचला आहे. आपण थेट त्या महिलांनाच विचारू या त्यांची काय प्रतिक्रिया आहे..... आजी, तुम्हाला कसं वाटतय.

आजी ः सकाळी सकाळीच पाणी घरात घुसले, आम्ही खूप घाबरलो, जीव वाचविण्यासाठी येथे येऊन बसलो आहोत. आता काय होणार माहिती नाही.


प्रतिमा ः कोणी सरकारी अधिकारी तुम्हाला मदत करायला आले होते का?

आजी ः अद्याप कोणीच आलं नाही. आमच्या घरातले इतर लोक कोठे गेले माहिती नाही. आम्ही खूप घाबरलो आहोत.


प्रतिमा ः आताच आपण या आजींची प्रतिक्रिया एेकली. शहरात महापुराने हाहाकार माजविला असताना सरकार झोपले आहे. आतापर्ंयत या महिलांपर्ं.त कोणतीही मदत पोचलेले नाही. त्यांच्या घरातील इतर सदस्य कोठे गेले, हेही त्यांना ठावूक नाही, कदाचित ते या महापुराचे बळीही ठरले असावेत. पण आपले सरकार किती संवदेनशून्य आहे. याची प्रचिती आली. घटनास्थळी सर्वप्रथम आमचा कॅमरा पोहचला. त्यामुळे त्या महिल्यांच्या समस्यांना वाचा फुटली... सारंग.

सारंग ः नक्कीच प्रतिमा, आपण सर्वप्रथम ही दृष्य दाखवित आहोत. महापुराचे लोक कसे बळी जात आहेत, हे आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवित आहोत. ताज्या माहितीसह पुन्हा काही वेळात येत आहोत. तोपर्यत तुम्ही कोठेही जाऊ नका पाहत रहा फक्त........

1 टिप्पणी:

kiran damle म्हणाले...

झकास टिप्पणी केलीत राव,
चँनवाल्याना स्कुबा गियर दिलं तर पाण्याखाली सुध्दा प्रतिक्रीया घेतील. :)