रविवार, १८ सप्टेंबर, २०११

पोलिसांचे दुर्लक्ष अन्‌ तो बनला अतिरेकी

 मुलाचे रात्री अपरात्री घरी येणे, वाईट मित्रांची संगत, घरातील व्यक्तींना दिली जाणारी दुरुत्तरे यावरून आपला मुलगा वाईट मार्गाला लागला आहे, हे पित्याने ओळखले. त्यावर गप्प न बसता त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यासाठी सतत चार वर्षे पाठपुरावा केला... पण अशा विनंत्या ऐकतील ते पोलिस कसले. शेवटी व्हायचे तेच झाले, त्यांचा मुलगा छोटा राजनच्या हस्तकांच्या टोळीत सहभागी झाला.

सुरेंद्र बहादूरसिंग पुरोहित याला छोटा राजनच्या हस्तकांसमवेत पोलिसांनी अटक केल्याचे कळाले आणि पिता बहादूरसिंग व्यथित झाले. एवढा पाठपुरावा करूनही पोलिसांनी लक्ष घातले नाही, त्यामुळे मुलगा बिघडला आणि आता समाज आपल्याकडे या अशा मुलाचा बाप म्हणून बोट दाखविणार याचे त्यांना जास्त वाईट वाटते. बहादूरसिंग भोपालसिंग पुरोहित (वय 58) यांचे नागपूर चाळ येथे मेहता ज्वेलर्स नावाचे छोटेसे ज्वेलरी दुकान आहे. बाजारपेठेत आणि समाजातही त्यांचे चांगले नाव आहे. खासगी नोकरी करता करता त्यांनी मोठ्या कष्टातून आपला व्यवसाय उभा केला. दोन मुलींचे विवाह झाले. आणखी एक मुलगी शिक्षण घेत आहे; पण दुःख एवढेच की मुलगा दिवटा निघाला. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्याच्या स्वैरपणाला लगाम घालण्यासाठी त्यांनी त्याचाही विवाह करून दिला. घरी पत्नी आल्यावर तो सुधारेल, संसाराला लागेल, अशी त्यांची अपेक्षा; पण तीही व्यर्थ ठरली.

त्याचा वावर सतत गुंड प्रवृत्तीच्या मित्रांबरोबर असायचा. त्यांच्यासोबतच तो जास्त काळ फिरायचा. काय करतो, कोठे जातो, याची माहिती तो घरी देत नसे. कोणी विचारले तर त्यांच्या अंगावर धावून जात असे. मुलगा आणखी बिघडू नये, यासाठी मन घट्ट करून बहादूरसिंग यांनी त्याच्याबद्दल आणि त्याच्या मित्रांबद्दल पोलिसांना माहिती दिली. एकदा, दोनदा नव्हे, तीन चार वर्षे ते सतत पोलिसांना याबद्दल विनवत होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी पोलिस आयुक्तांचीही भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले होते. आपला मुलगा आणि त्याचे मित्र यांची चौकशी करावी, त्यांना वेळीच आवर घालून अतिरेकी बनण्यापासून रोखावे, अशी मागणी त्यांनी केली होती. आपण एवढे प्रयत्न करूनही त्याला रोखू शकलो नाही. याची खंत आता पुरोहित कुटुबींयाना आहे. पोलिस आणि नशिबाला दोष देत समाजाची समजूत काढण्याशिवाय त्यांच्यापुढे आता पर्याय राहिला नाही.


आणि त्याचे धाडस वाढले....

एका पित्याची ही कैफियत पोलिसांना कळालीच नाही. स्वतःच्या मुलाला पाठीशी घालण्यासाठी पोलिसांकडे येणारे पिता अनेक असतील, पण मुलाच्या दुष्कृत्यांबद्दल माहिती देण्यासाठी पुढे आलेल्या पित्यालाही बेदखल करण्यात आले. खुद्द आपल्या पित्यानेच तक्रार केली तरी पोलिस काही करीत नाहीत, हे कळाल्यावर मुलाचे धैर्य वाढत गेले आणि तो गुन्हेगार बनला.                        (सकाळ)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: