रविवार, १५ जानेवारी, २०१२

मंगळसूत्र चोऱ्या ः गुन्हा सोपा; तपास अवघड....

अनुराधा कापसे सायंकाळी फिरायला बाहेर पडल्या. सोसायटीच्या समोरील मुख्य रस्त्यावर आल्या. काही अंतर पुढे जाताच दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. काही कळायच्या आत चोरटे दिसेनासे झाले. त्यानंतर अनुराधा घरी आल्या. घरातील लोकांना त्यांनी घटनेची माहिती दिली. त्यानंतर तक्रार देण्यासाठी पोलिस चौकी गाठली. तेथे पोलिसांनी मंगळसूत्राची पावती मागण्यापासून एकट्या फिरायला कशाला निघाल्या होत्या, असे सगळे प्रश्‍न विचारून शेवटी कशीबशी तक्रार दाखल करून घेतली. तोपर्यंत दीड-दोन तास उलटून गेले होते. तरीही उपचार म्हणून बीट मार्शल घटनास्थळी जाऊन आले. चोरटे गेले त्या दिशेने थोडे अंतर पुढे शोध घेतला. त्यानंतर "आरोपी सापडल्यावर कळवितो,' असे सांगून पोलिस निघून गेले. बराच काळ उलटला तरी पोलिसांचा दूरध्वनी आला नाही, म्हणून कापसे यांनीच एकदा विचारून पाहिले, तर "तपास सुरू आहे,' एवढेच उत्तर मिळाले. घटनेला कित्येक महिने उलटून गेले, तरीही त्याचे पुढे काय झाले, हे कापसे यांना समजलेले नाही.
असा प्रसंग ओढवलेल्या कापसे एकट्या नाहीत. पुण्यात अशा घटना आता सर्रास घडू लागल्या आहेत. 2011 मध्ये तब्बल 280 घटना नोंदल्या गेल्या आहेत. त्यांतील केवळ 146 घटनांचा तपास लागला आहे.

या घटना का वाढत आहेत, त्यांचा तपास का रखडतो, तपास लागल्यावर आरोपींना शिक्षा होते का, चोरीस गेलेले दागिने परत मिळतात का, कोण आहेत यातील आरोपी, असे अनेक प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होतात. एका चित्रपटात दुचाकीच्या कसरतींची दृष्यं आहेत त्यावरून या घटनांना "धूम स्टाईल' चोरी असेही नाव पडले आहे. कमी धोका आणि कमी श्रम असलेले हे गुन्हे करण्यास सोपे, पकडले जाण्याची शक्‍यता कमी, चोरीच्या मालाची विल्हेवाट लावणे सोपे. यामुळे हे प्रकार वाढत गेले. एक दुचाकी आणि ती चालविण्यासाठी साथीदार, एवढेच भांडवल. चोरलेले दागिने सराफी दुकानात विकले जातात. कमी भावात मिळणारे हे सोने सराफही विकत घेतात. सोने वितळून त्याची चीप बनविली, की पुरावा संपला, असे त्यांना वाटते. आरोपी पकडला गेल्यावर त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिस त्या सराफी दुकानात जाऊन चोरीचा माल हस्तगत करतात. अशा वेळी चोरीचा माल घेतला म्हणून त्या सराफालाही त्या गुन्ह्यात अटक करण्याची तरतूद आहे; मात्र, मूळ प्रकरणात पुरावा भक्कम करण्यासाठी पोलिस त्या सराफाला साक्षीदार करीत व अजाणतेपणे माल घेतला, अशी साक्ष घेतली जायची. प्रत्यक्षात मात्र, अनेक सराफ साक्षीदार न्यायालयात फितूर होत असत, त्यामुळे पकडलेले आरोपी सुटत. त्यामुळे पोलिसांनी सराफांनाही आरोपी करण्यास सुरवात केली. मात्र, दोषारोपपत्रात राहणाऱ्या त्रुटी, प्रत्यक्ष घटना आणि न्यायालयात उभा राहणारा खटला या दरम्यान उलटून गेलेला बराच कालावधी, साक्ष देताना महिलांची उडणारी तारांबळ यामुळे आरोपी सुटण्याचे प्रमाण वाढतच राहिले. बोटांवर मोजण्याइतक्‍या प्रकरणांतही शिक्षा होत नाही. त्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढत राहिले.

या गुन्ह्यांची सोपी पद्धत पाहता, बेरोजगार तरुण याकडे आकर्षित झाल्याचे दिसून येते. केवळ पुण्यातीलच नव्हे, तर ग्रामीण भाग आणि नगर जिल्ह्यातील आरोपीही पुण्यात येऊन असे गुन्हे करीत असल्याचे उघड झाले आहे. अलीकडे परप्रांतीय आरोपीही यामध्ये आढळून येऊ लागले आहेत. चोरीची पद्धतच अशी आहे, की पोलिस ठाण्याच्या जवळ घटना घडली तरीही पोलिस आरोपींना पकडू शकत नाहीत. एक तर अचानक घडलेल्या घटनेमुळे महिलांना ना आरोपींचे वर्णन आठवते ना दुचाकीचा क्रमांक. त्यामुळे आरोपींचा शोध घेणे अवघड बनते. यावर उपाय म्हणून पोलिस आयुक्तांनी यासाठी बक्षीस योजना जाहीर केली होती. आरोपींचे मोबाईलवर फोटो काढा, त्याचे नेमके वर्णन सांगा, त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करा आणि दहा हजार रुपये मिळवा, अशी ही योजना होती. मात्र, ती अशक्‍य असल्याचे आढळून आल्याने, जाहीर होताच ती गुंडाळण्यात आली. तरीही काही महिलांनी धाडसाने काही आरोपींना पकडून दिले. त्यांच्याविरुद्ध खटले सुरू आहेत; मात्र, मोकळे असलेले इतर आरोपी आणि नव्याने तयार होणारे गुन्हेगार यामुळे या घटना थांबलेल्या नाहीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: