बुधवार, १ जुलै, २००९

पोलिसांच्या बदल्यांसाठी आमदारकी पणाला!

विधानसभेत किती वेळा तोंड उघडलं याला इथं महत्त्व नाही. विकासासाठी किती निधी खेचून आणला याच्याशी काही देणंघेणं नाही; पण पोलिस ठाण्यात आमदाराच्या शब्दाला किती "वजन' आहे यावर तो आमदार कामाचा किंवा बिनकामाचा ठरवला जात असल्याने सध्या काही आमदारांनी पोलिसांच्या बदल्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. निवडणुकीच्या काळात खालच्याखाली आपल्या कार्यकर्त्यांची कामे व्हावीत यासाठी "सोयीचे' पोलिस असावेत म्हणून ही धडपड आहे.

या बदल्यांसाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर दडपण येत आहेत. कारण आमदार कामाचा, की बिनकामाचा हे ठरविण्याचे निकषच लोकांनी बदलले आहेत. जो पोलिस ठाण्यात रात्री अपरात्री फोन करतो, आपला माणूस एका फोनवर सोडवून आणतो, गुन्ह्यातील कलमे सौम्य होण्यासाठी फौजदार, हवालदारांशी थेट वाटाघाटी करतो तो आमदार "कामाचा' असा निकष लावला जातो. आमदाराने गावासाठी कितीही मोठे विकासकाम केलेले असू दे; पण त्याने एखाद्या प्रकरणात पोलिस ठाण्यास फोन केला नाही तर तो आमदार बिनकामाचा ठरवला जातो.

लोकांच्या या बदललेल्या मानसिकतेचा काही आमदारांनी बरोबर फायदा उठवला आहे. विधानसभा मतदारसंघातील दोन पोलिस ठाणी सांभाळली, की आपली आमदारकीही लोकांकडून बऱ्यापैकी सांभाळली जाते याचा त्यांनी अंदाज घेतला आहे. यातूनच पोलिस ठाण्याच्या निरीक्षक, उपनिरीक्षक, हवालदार ते कॉन्स्टेबलपर्यंत आपलीच माणसे असली पाहिजेत, याकडे आमदारांचे लक्ष आहे. एखाद्या गुन्ह्यात गृहमंत्री मदत करू शकत नाही, पण एखादा चतूर हवालदार केवळ मदतच नव्हे, तर सुटकेचा मार्गही कसा काढू शकतो याचा आमदारांना अनुभव आहे. त्यामुळे आपल्याला हवा तो हवालदार, कॉन्स्टेबल आपल्याला हव्या त्या पोलिस ठाण्यात आणण्यावर भर दिला जात आहे. अधिकारी कितीही नियमाचा बांधील असला तरीही त्याला अशा बदल्या कराव्याच लागल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. हे अधिकारी एखाद्या राजकीय नेत्याच्या आशीर्वादामुळे नेमले गेले असतील तर ते त्याच नेत्याच्या इशाऱ्यावरच काम करतात हा आजवरचा अनुभव आहे. (sakal news)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: