गुरुवार, १९ मे, २०११

खोपडेंनी पुस्तकातूनही केला वरिष्ठ वर्दीवर हल्ला

पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेबद्दल आयुक्तांना पत्र लिहून त्याची जाहीर वाच्यता करणारे विशेष पोलिस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांनी त्यांच्या पुस्तकातही इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या धोरणांवर टीका केली आहे. मुंबईचे तत्कालीन आयुक्त हसन गफूर, डी. एन. जाधव, ए. एन. रॉय यांचा नावासह उल्लेख करीत, तर महासंचालक डॉ. ओ. पी. बाली, डॉ. पी. एस. पसरिचा यांच्या कार्यकाळाचा उल्लेख करून त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले आहेत.
वरिष्ठांच्या बैठकांमधील चर्चा आणि पोलिस दलातील इतर अनेक गोष्टीही त्यांनी यातून चव्हाट्यावर आणल्या आहेत. त्यांनी स्वतः केलेले प्रयोग कसे बरोबर आहेत, हे स्पष्ट करून सध्याची पद्धत कालबाह्य झाल्याचे म्हटले आहे.

श्री. खोपडे यांनी लिहिलेल्या 'मुंबई जळाली, भिवंडी का नाही?' या पुस्तकाचे आधी मुंबईत आणि आता पुण्यात प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन कार्यक्रमात बोलताना खोपडे यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी राबविलेल्या उपक्रमांवर टीका केली होती. ज्या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्या पुस्तकातही इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या धोरणांवर टीका आहे. काही ठिकाणी नावांसह, तर काही ठिकाणी नाव टाळून त्यांनी ही विधाने केली आहेत. पोलिस दलाच्या कामकाजात सुधारणा करण्याविषयी 2003 मध्ये पोलिस महासंचालकांना दिलेले पत्र आणि त्यावर आलेले त्यांचे उत्तरही पुस्तकात जसेच्या तसे छापण्यात आले आहे. (त्या वेळी ओ. पी. बाली महासंचालक होते.) खोपडे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी सुचविलेले उपाय गरजेनुसार राबविले जात असल्याचे सांगून पुन्हा असे निरुपयोगी पत्र पाठवू नये, अशी तंबीच तत्कालीन महासंचालकांनी खोपडे यांना दिली होती.

त्यानंतर पुन्हा 2006 मधील महासंचालकांच्या एका बैठकीतील प्रकारही त्यांनी पुस्तकात नमूद केला आहे. (त्या वेळी डॉ. पी. एस. पसरिचा हे महासंचालक होते आणि ए. एन. रॉय मुंबईचे पोलिस आयुक्त होते). जुलै 2006 मध्ये रेल्वे बॉंबस्फोटानंतर तत्कालीन पंतप्रधान मुंबई भेटीवर आले होते. त्यांनी महासंचालक, मुंबईचे पोलिस आयुक्त आणि रेल्वेचे पोलिस आयुक्त असलेले खोपडे यांची बैठक बोलाविली. बैठकीत अजिबात बोलू नये, अशी तंबी महासंचालकांनी बैठकीआधी आपल्याला दिल्याचे खोपडे यांनी पुस्तकात म्हटले आहे. त्याचे कारण सांगताना त्यांनी म्हटले आहे की, दादर रेल्वे स्थानकावर एका परदेशी व्यक्तीच्या वस्तू चोरण्यावरून सुरक्षा दलाचे महासंचालक आणि पोलिस महासंचालक यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे पोलिस महासंचालकांनी रेल्वे फलाटावर कोणत्याही प्रवाशाची तपासणी न करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे तपासणी बंद करण्यात आली होती आणि त्यानंतर दोनच दिवसांनी रेल्वेत बॉंबस्फोट झाला होता. ही गोष्ट आपण पंतप्रधानांना सांगू की काय, या शक्‍यतेमुळे महासंचालकांनी गप्प राहण्याची तंबी दिली होती. त्याच बैठकीच्या संदर्भाने मुंबई पोलिस आयुक्तांबद्दलही पुस्तकात विधाने आहेत. खोपडे यांनी सुरू केलेल्या मोहल्ला कमिट्या तत्कालीन आयुक्तांनी बंद केल्या होत्या. त्यामुळे पोलिसांचा जनतेशी संपर्क दुरावला होता. पंतप्रधानांनी उपाययोजनांबद्दल विचारले, तेव्हा आयुक्तांनी या उपाययोजना सुरूच असल्याचे त्यांना खोटेच सांगितले होते, असा उल्लेख करून खोपडे म्हणतात, "देशाच्या प्रमुखापुढे खोटे बोलणारा वरिष्ठ नोकरशहा किती आत्मकेंद्री व अहंकारी आहे, याची प्रचिती आली.'

मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त जाधव आणि हसन गफूर यांच्याबद्दलही पुस्तकात उल्लेख आहे. या दोघांनी आपल्याला पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत अपमानित करून आपला सुधारणा प्रकल्प बंद करण्यास सांगितले होते. त्यासंबंधी एक लेखी पत्रही आपल्याला देण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी पुस्तकात केला आहे. 26 नोव्हेंबर 2008 मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासंबंधीही हसन गफूर यांच्या कार्यपद्धतीवर शंका घेणारी विधाने केली आहेत. हल्ला झाला तेव्हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचे दल असलेल्या मुंबई पोलिसांचे नेते काय करीत होते, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.


कोणाबद्दल काय?
- माजी महासंचालक ओ. पी. बाली - मुंबईतील बॉंबस्फोट कसे थांबविता येतील, याच्या सूचना करणारे पत्र दिले, तर महासंचालकांनी लेखी पत्र देऊन माझा आवाज बंद केला. (दोन्ही पत्रे जशीच्या तशी छापण्यात आली आहेत.)

- माजी महासंचालक डॉ. पी. एस. पसरिचा - रेल्वे प्रवाशांची तपासणी बंद करण्याचे आदेश दिले अन्‌ त्यानंतरच बॉंबस्फोट झाले, ही गोष्ट पंतप्रधानांना सांगू नये, यासाठी तंबी दिली.

- माजी मुंबई पोलिस आयुक्त ए. एन. रॉय - मोहल्ला कमिटीचा उपक्रम बंद करायला लावला. शिवाय पंतप्रधानांच्या बैठकीत तो सुरूच असल्याबद्दल खोटेच सांगितले.

- माजी मुंबई पोलिस आयुक्त हसन गफूर - नॉर्थ रिजन मुंबई हा प्रयोग बंद करायला सांगितला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मला एकट्याला उभे केले आणि प्रश्‍न विचारून अपमानित केले. 26 नोव्हेंबर हल्ल्याच्या वेळी मुंबईत पोलिसांचे हे नेते कोठे गेले होते?



सुधारणांची पद्धत चुकीची

पोलिस दलात सुधारणांसाठी मॅकेंझी कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. खोपडे यांनी त्याबाबतही प्रतिकूल मते व्यक्त केली आहेत. पोलिसांचे सध्याचे ब्रीदवाक्‍यही निरर्थक ठरत असून, पोलिस दलात हिंदुधर्मातील वर्णाश्रम पद्धतीची उतरंड असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. हे सर्व सांगताना आपण केलेले आणि सुचवत असलेले प्रयोग योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.  (सकाळ)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: