रविवार, १४ फेब्रुवारी, २०१०

आणखी किती स्फोट सहन करणार?

पाक पुरस्कृत दहशतावाद आता आपल्यासाठी नवा राहिलेला नाही. अमेरिकेतील हल्ल्यानंतर तर त्याची जगभर वाच्च्यता झाली. भारतात तर स्फोटांची आणि अतिरेकी हल्ल्यांची मालिकाच सुरू आहे. आपण मात्र पाकिस्तानशी शांततेच्या मार्गाने चर्चा करू इच्छित आहोत. आपल्या कॉंग्रेस सरकारचे धोरणच ते आहे म्हणे. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात आपल्या बहादूर पोलिसांनी पकडून दिलेला पाक आतिरेकी आपण मोठा खर्च करून अद्याप सुखरूप ठेवला आहे. का? तर आमचे कायदे आणि आमची धोरणे किती सहिष्णू आहेत, हे आम्हाला जगाला दाखवून द्यायचे आहे म्हणे. त्यासाठी आम्ही कितीही स्फोट सहन करायला तयार आहोत, अशीच आपल्या राज्यकर्त्यांची भूमिका दिसते. सामान्य जनता हल्ले आणि स्फोटांनी होरपळून जात असताना राज्यकर्त्यांना ही असली कचखाऊ धोरणे सुचतात. घटना घडल्यावरही त्याचे राजकारण केले जाते. एकमेकांवर आरोप करून दोष देण्यात धन्यता मानली जाते. त्यांचा हा सर्व खेळ सत्तेसाठी असतो. सर्वच पक्षांचे राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत.

आपली पोलिस यंत्रणा तशी सक्षम आहे. असे अनेक हल्ले परतविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. परंतु सताधाऱ्यांनी पोलिस दलाला आपल्या हातचे बाहुले बनविले आहे. त्यांच्या बदल्या आणि बढत्यांच्या चाव्या आपल्याकडे ठेवून त्यांचा सोयीनुसार वापर केला जातो. पोलिस जनतेच्या रक्षणापेक्षा सरकारच्या इज्जतीच्या संरक्षाणासाठीच वापरलेले जात आहे. सरकारला एका चित्रपटाचे प्रदर्शन महत्त्वाचे वाटते. विरोधी पक्षाला अद्दल घडविण्यासाठी आणि आपल्या पक्षाच्या नेत्यांना खूष करण्यासाठी सर्व पोलिस दल चित्रपटाच्या बंदोबस्तासाठी लावले जाते. अशी अवस्था आपल्या पोलिसांची झाली आहे. शिवाय पोलिसांतील अतंर्गत राजकारण हा विषयही वेगळाच.

अशा परिस्थितीत दहशतवाद्यांना आपला देश म्हणजे मोकळे रान वाटू लागले तर नवल वाटू नये. कित्येक घटना घडूनही आपण त्यातून बोध घेत नाही. ना राज्यकर्ते सुधारतील ना विरोधी पक्ष. आता राज्यकर्ते सफाई देण्यात तर विरोधक आंदोलन करण्यात व्यस्त होतील. सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून दिले जाईल. पुढे काय करायचे, पुन्हा हल्ले होऊ नयेत, यासाठी काय धोरण घ्यायचे याचा विचार दूरच राहील. काही काळ आलेली सहानुभुतीची लाट पुन्हा ओसरली जाईल, ती थेट पुढील स्फोट होईपर्यंत.

आता जनतेनेच जागे झाले पाहिजे. केवळ रात्र नव्हे तर दिवसही वैऱ्याचा आहे, याचे भान ठेवून वागले पाहिजे. आपण ज्यांना राज्यकर्ते म्हणून निवडून दिले, त्यांच्याकडून संरक्षणाची हमी राहिलेली नाही. त्यामुळे आपले आपण संरक्षण करताना राज्यकर्ते आणि नाटकी आंदोलने करणाऱ्या विरोधांकानाही धडा शिकविण्यासाठी जनमताचा विस्फोट झाला पाहिजे. त्यातून धोरणात्मक बदल घडवून असे गुन्हे करणाऱ्यांना तात्काळ शिक्षेसाठी कायदा करणे आणि पाकला कायमचा धडा शिकविण्यासाठी राज्यकर्त्यांना भाग पाडले पाहिजे. तेव्हाच हे स्फोट थांबतील.

२ टिप्पण्या:

Leena Chauhan म्हणाले...

jo paryant kana nasalele shandh rajyakarte ahet toparyant he asech chalnar.... Gandhincha ahinsavaad evadha dokyavar ghetalay mag asach swabhimaanashivay jagayachi savay karayala havi. Kona kuthache pakistani apalya deshat ghusun vattel te kartat ani apale rajyakarte kaay kartat, nishedh kartat. charcha kartat samzota express suru kartat.

अनामित म्हणाले...

I want to know if a movement can be started through blogs to impress upon people that the government is not willing to protect you from terrorist attacks and we have to relay on our own alertness for protection.