रविवार, २९ जून, २०१४

अखेर पोलिस ठाणे आले

अलीकडेच चोरी न होणारे गाव म्हणून ओळख असलेल्या शनिशिंगणापूरला स्वतंत्र पोलिस ठाणे मंजूर झाले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. अंधश्रध्दा निर्मूलन समितीने १९९९मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांच्या या श्रध्देविरुध्द 'चला शनिशिंगणपुराला, चोरी करायला,' हे आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांना प्रचंड विरोध झाला होता. पोलिसांनीही हस्तक्षेप करून आंदोलकांना नगरमध्येच अटक केली होती. त्या विरोधापासून आज पोलिस ठाण्याच्या स्वागतापर्यंत झालेल्या बदलाचे स्वागतच केले पाहिजे.

शनिशिंगणापूर नगर जिल्ह्यातील एक छोटे गाव. येथे चोरी होत नाही, झाली तर शनिदेवाच्या कृपेने चोर गावाबाहेर जाऊ शकत नाही, अशी येथील लोकांची श्रध्दा. त्यामुळे गावातील घरांना, दुकानांना एवढेच काय तर बँकेलाही दारे नाहीत. १९९२ पासून हे गाव प्रकाशझोतात आले ते गुलशनकुमार यांच्या 'सूर्यपूत्र शनिदेव' या कॅसेटमुळे. भक्तांचा ओघही येथे वाढला. 'देव आहे, पण देऊळ नाही, झाड आहे पण सावली नाही, घरे आहेत पण दरवाजा नाही.' हे ब्रीदवाक्य भाविकांमध्ये लोकप्रिय झाले. तीन हजार लोकवस्ती असलेल्या गावठाणात ही श्रध्दा आजही जपली आहे. २०११ मध्ये गावात सुरू झालेल्या युको बँकेलाही दारे नाहीत. पण या श्रध्देला तडा देणारी घटना २०१० मध्ये घडली. २५ ऑक्टोबरला गावात देवदर्शनासाठी आलेल्या हरियाणा येथील एका कुटुंबाचा ३५ हजार रुपयांचा ऐवज गावातून चोरी गेला. हताश कुटुंबाची काही गावकरी समजूत काढत होते. पण त्यांना न जुमानता मंजू सहरावत यांनी सोनई पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. ही शिंगणापूरमधील पहिली चोरी मानली जाते. या प्रकरणाला मोठी प्रसिध्दी मिळाली. अर्थात सोनई पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डनुसार १९९५ मध्ये निफाडचे बबन सरकारी लोखंडे यांचे पाच हजार रुपये शिंगणापूरमधून चोरीस गेल्याचा गुन्हाही दाखल झाल्याचे आढळते. या पार्श्वभूमीवर शिंगणापूरला स्वतंत्र आणि नेवासे तालुक्यातील तिसरे पोलिस स्टेशन होत आहे. त्यासाठी भरतीही सुरू आहे. अर्थात हे स्वतंत्र पोलिस ठाणे गावकऱ्यांच्या श्रध्देला छेद देण्यासाठी नव्हे; तर तेथील कायदा व सुव्यवस्था, व्हीआयपींसाठी बंदोबस्त आणि वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेऊन स्थापन केले जात असल्याचे गृहविभागाचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षापासून शनिशिंगणापुरात व्यावसायिक आणि त्यांचे एजंट यांच्याकडून भाविकांची होणारी लूट, फसवणूक, दादागिरी वाढली आहेच. ती आटोक्यात आणण्यासाठी पोलिस ठाण्याचा उपयोग व्हावा, अशी आता गावकऱ्यांचीही अपेक्षा आहे.                   (दखल- महाराष्ट्र टाइम्स)