मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०१०

लॉटरीच्या 'एसएमएस'द्वारेही सुरू आहे फसवणूक

'अभिनंदन! आपल्याला एक लाख डॉलरचे बक्षीस लागले असून, खालील पत्त्यावर संपर्क साधा,' असा संदेश तुमच्या मोबाईलवर आला, तर त्याला मुळीच प्रतिसाद देऊ नका. कारण, "ई-मेल'पाठोपाठ आता मोबाईल "एसएमएस'द्वारेही लॉटरीच्या नावाने लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

इंटरनेट वापरणाऱ्यांना या प्रकाराचा अनुभव खूप दिवसांपासून येत आहे. त्यांच्या "ई-मेल' खात्यावर असे "ई-मेल' येतात. संगणकाद्वारे काढण्यात आलेल्या लॉटरीत आपला ई-मेल आय.डी. बक्षिसासाठी निवडला गेल्याचा दावा त्यामध्ये केलेला असतो. ते बक्षीस आपल्यापर्यंत पाठविण्यासाठी प्रथम आपली माहिती आणि त्यानंतर काही पैशांची मागणी केली जाते. त्यासाठी बॅंकेतील खाते क्रमांक कळविला जातो. त्यामध्ये पैसे जमा करण्यास सांगण्यात येते. त्याला प्रतिसाद दिला, की पुढील "प्रक्रिया' सुरू होते. बक्षीस पाठविण्याचा खर्च म्हणून पैसे भरण्यास सांगण्यात येते. एकदा पैसे भरले तरी विविध कारणे सांगून पुन्हा पुन्हा पैसे भरण्यास सांगण्यात येते. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात येते.

आता हाच प्रकार मोबाईलच्या बाबतीत होत आहे. खासगी कंपन्यांबरोबरच भारत संचार निगमच्या मोबाईलवरही असे "एसएमएस' येतात. "आपला क्रमांक बक्षिसासाठी निवडण्यात आला आहे. अमुक-तमुक देशाच्या लॉटरीचे बक्षीस आपल्याला देण्यात येणार असून, त्यासाठी खालील ठिकाणी संपर्क साधा', असा हा संदेश असतो. त्यानंतर पुढील "प्रक्रिया' ई-मेलद्वारे केल्याप्रमाणेच असते. अशाप्रकारेही अनेकांना गंडा घातला गेल्याची उदाहरणे आहेत.

या संदर्भात पोलिसांच्या सायबर क्राइम विभागातील गणेश येमूल यांनी सांगितले की, असे प्रकार नायजेरियातून जास्त प्रमाणात केले जातात, असे आढळून आले आहे. तेथे फसवणूक करणे हा गुन्हा मानला जात नाही. त्यामुळे अशा प्रकारांना चालना मिळते. आपल्याकडे तक्रार आल्यावर गुन्हा दाखल झाला तरी संबंधित देशाशी आरोपी हस्तांतरणाचा करार नसल्याने आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचता येत नाही.

असे मिळवतात नंबर
 मोबाईल कंपन्यांच्या बल्क "एसएमएस' सेवेद्वारे असे "एसएमएस' पाठविले जातात. यासाठीचे नंबर कॉल सेंटरमधील काही कर्मचारी, मोबाईल कंपन्यांचे छोटे-मोठे वितरक किंवा ज्यांच्याकडे मोबाईल क्रमांकांचा संच आहे, अशा लोकांकडून मध्यस्थांमार्फत मिळविले जातात. त्याबद्दल त्यांना मोबदला मिळत असल्याने तेही यासाठी तयार होतात. याचा वापर कशासाठी होणार आहे, हेही त्यांना अनेकदा ठाऊक नसते. (सकाळ, पुणे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: