बुधवार, १५ एप्रिल, २००९

दागिन्यांना पॉलिशचा मोह पडतो महागात!


महिलांना नव्या दागिन्यांचा जसा मोह असतो, तसाच जुने दागिने चमकविण्याचाही. त्यामुळे दारावर पॉलिश करून देण्याच्या आमिषाने येणारे भामटे त्यांना सहजगत्या फसवू शकतात.वारंवार असे प्रकार घडूनही महिलांनी त्यातून बोध का घेऊ नये?

सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्याचेही प्रकार सातत्याने घडतात; मात्र त्यात पकडल्या जाणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. त्यांचे नाव-गाव तर दूरच; त्यांचे वर्णनही महिलांना सांगत येत नाही. त्यामुळे एका ठिकाणी गुन्हा करून गेलेली ही टोळी काही अंतरावर पुन्हा "शिकार' गाठते. घरात एकट्या असलेल्या गृहिणींना लक्ष्य केले जाते. सुरवातीला छोट्या भांड्यांना पॉलिश करून दाखविले जाते. त्यासाठी माफक रक्कम आकारली जाते. नंतर आजी, मावशी, मॉं, आत्या या विशेषणांद्वारे भामटे जवळीक साधतात. विश्‍वास बसल्याची जाणीव झाली, की देवघरातील चांदीची एखादी वस्तू मागवून ती मोफत पॉलिश करून दाखवितात. "सोन्याचे दागिनेही आम्ही चांगले पॉलिश करून देतो', असे ते सांगतात. महिला विश्‍वासाने त्यांच्याकडे दागिने पॉलिशसाठी देतात. ते पातेल्यातील हळदीच्या पाण्यात दागिने टाकतात. साफ करीत आहोत, असे दाखवितात. त्या वेळी त्यांच्या गप्पांना बहर येतो. थोड्या वेळाने ते पातेले गॅसवर ठेवण्यास सांगितले जाते. "पाणी उकळू लागले, की पातेले खाली उतरवा', असे सांगून भामटे निघून जातात.
थोड्या वेळाने ती गृहिणी पातेले खाली उतरवते, तेव्हा त्यात दागिने नसल्याचे दिसून येते. दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने त्यांनी दागिने कधी काढले, ते गृहिणींच्या लक्षातही येत नाही.
अशाप्रकारे गुन्हे करणारे राजस्थान, ओरिसा, बिहार भागातील भामटे आहेत. काही बंगाली कारागिरांचाही सहभाग असल्याचे पोलिसांना आढळले आहे. थोडी-फार मराठी भाषा त्यांना येत असते. त्यामुळे हिंदी- मराठीद्वारे ते संभाषण करतात. बऱ्याच वेळा गुन्हा करताना दोघे जण असतात. एका ठिकाणी गुन्हा केल्यावर लगेचच दुसऱ्या लांबच्या भागात ते रिक्षाने किंवा दुचाकीवरून पलायन करतात. स्थानिक सराफी व्यावसायिकांकडे दागिने विकले जातात. त्यामुळे मुद्देमाल हस्तगत करणेही कठीण जाते.
प्रत्येक वेळी साथीदार बदलत असल्यामुळे "रेकॉर्डवर' फार थोडे गुन्हेगार येतात. महिलांकडून वर्णन व्यवस्थित सांगितले जात नसल्यामुळे रेखाचित्र तयार करण्यावर पोलिसांना मर्यादा येतात. शिवाय, लुटल्या गेलेल्या सर्वच महिला पोलिसांकडे तक्रार देत नाहीत. काही वेळा पोलिस संशयित पकडतात, तेव्हा ओळख पटविण्यासाठी फसवणूक झालेल्या महिलांना बोलाविले जाते; परंतु "झंझट' नको म्हणून त्या पोलिसांना मदत करणे टाळतात, असा पोलिसांचा अनुभव आहे. आपण फसले गेलो आहोत, हे समजल्यावर पती किंवा घरचे लोक ओरडतील, या भीतीनेही अनेक महिला फिर्याद देत नाहीत. बऱ्याचदा त्या घटनेची वाच्यताही करीत नाहीत. दागिना मोठा असेल किंवा पर्याय नसेल, तेव्हा मात्र पोलिसांकडे त्वरित तक्रार दिली जाते, असाही अनुभव आहे; मात्र त्याचा मोठा फायदा भामट्यांना होतो.
दागिन्यांना पॉलिश करून घ्यायचे असेल, तर विश्‍वासू सराफाकडे जा. स्वतः उभे राहून दागिने पॉलिश करून घ्या. दारावर कोणी आले, तर त्यांच्याकडून पॉलिश करून घेताना लुटले जाण्याची जोखीम आहे, ती ओळखून खबरदारी घ्या, अन्यथा दागिने गमवावे लागण्याची शक्‍यता आहे. या गोष्टी महिलांनी लक्षात ठेवल्या, तरी फसवणुकीचे प्रमाण कमी होईल.

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

अच्छी ब्लॉग हे / मराठी और हिन्दी मे टाइप करने केलिए आप कौनसी टाइपिंग टूल का इस्तीमाल करते हे..?
रीसेंट्ली, मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लॅंग्वेज टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा ता तो मूज़े मिला " क्विलपॅड " /
आप भी "क्विलपॅड" www.quillpad.in यूज़ करते हे क्या...?