रविवार, १५ ऑगस्ट, २०१०

सकाळी न्यायदंडाधिकारी, दुपारी आरोपी!

सकाळी आठ वाजता न्यायालयाचे कामकाज सुरू झाले, की न्यायदंडाधिकारी महोदयांना रीतीप्रमाणे सन्मानाने स्थानापन्न केले जाते. नंतर न्यायदानाचे काम सुरू होते. ते संपल्यावर जेव्हा त्याच ठिकाणी दुपारी न्यायालय भरते, तेव्हा आरोपीच्या नावाचा पुकारा होतो आणि हेच न्यायदंडाधिकारी महोदय आरोपी म्हणून चक्क आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहतात. असा अजब प्रकार नगर येथील एका न्यायालयात सुरू आहे.

प्रलंबित खटले लवकर निकाली काढण्यासाठी राज्यभरात सकाळी व सायंकाळी विशेष न्यायालये सुरू करण्यात आली आहेत. नगरमध्येही सकाळी आठ ते दहा या वेळेत न्यायालय भरते. त्यासाठी नेहमीच्या न्यायदंडाधिकाऱ्यांऐवजी विशेष न्यायदंडाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरमध्ये या पदावर एका सरकारी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नियुक्‍त्या उच्च न्यायालयाकडूनच होतात. हे अधिकारी पाटबंधारे विभागात कुकाणे (ता. नेवासे) येथे नियुक्तीस आहेत. त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली असून, यापूर्वी विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे. त्यामुळेच बहुदा त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली असावी. येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयातच सकाळचे न्यायालय भरते. तेथे ते विशेष न्यायदंडाधिकारी म्हणून न्यायनिवाड्याचे काम करतात. किरकोळ स्वरूपाची व दंडात्मक शिक्षा असलेली प्रकरणे त्यांच्यासमोर चालविली जातात. जूनपासून हे न्यायालय सुरू झाले. सकाळच्या सत्रात हे अधिकारी न्यायदंडाधिकारी असतात, तर त्याच न्याय कक्षात दुपारी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचे नियमित न्यायालय सुरू होते. तेथे म्हणजे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात या अधिकाऱ्याविरुद्धच विनयभंगाचा खटला सुरू आहे. त्याच्या तारखा सुरू झाल्यावर हा प्रकार लक्षात आला. सकाळी न्यायाधीश म्हणून खुर्चीत बसणारी व्यक्ती दुपारी त्याच न्यायालयात आरोपी म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात कशी? असा प्रश्‍न पक्षकार, कर्मचारी व वकिलांना पडला आहे.

हा खटला जुना आहे. त्यांच्या नातेवाईक महिलेनेच त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. ती नातेवाईक महिला वकील असून, याच न्यायालयात वकिली करते. 9 सप्टेंबर 2008 ला या अधिकाऱ्याने आपल्या घटस्फोटित महिला नातेवाइकाच्या घरात घुसून विनभंग केल्याची तक्रार आहे. जागेची कागदपत्रे दाखविण्याच्या बहाण्याने ते घरात आले व आपला विनयभंग केला, अशी फिर्याद तिने दिली आहे. तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण न्यायालयात पाठविले. 2 मे 2009 रोजी या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले. त्यावर अनेक तारखा पडल्या. सध्या हे प्रकरण मुख्य न्यायदंडाधिकारी जी. ओ. अग्रवाल यांच्यासमोर सुनावणीस आहे. गेल्या तारखेला म्हणजे 7 ऑगस्ट 2010 रोजी आरोपीवर दोषारोप निश्‍चित करण्यात (चार्ज फ्रेम) आले आहेत. त्यावर पुढील सुनावणी आता 21 सप्टेंबर 2010 रोजी होणार असून, त्या तारखेपासून साक्षीपुरावा नोंदविण्यास सुरवात होणार आहे.

अर्थात हा गुन्हा खरा की खोटा, याचा निकाल न्यायालयातच होईल. गुन्हा दाखल होण्यामागे वेगळी कारणेही असू शकतील. मात्र, इतर सरकारी पदावर नियुक्ती देताना चारित्र्य पडताळणीची अट असून, त्याचे पालनही केले जाते. विशेष न्यायदंडाधिकाऱ्यांसारख्या पदावर नियुक्ती देताना या गोष्टीकडे कसे दुर्लक्ष झाले, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

सकाळी नगर दुपारी कुकाणे!

हे अधिकारी कुकाणे (ता. नेवासे) येथे नोकरीला आहेत. कुकाणे नगरपासून सुमारे साठ किलोमीटर असून, तेथे जाण्यास दीड तास लागतो. त्यामुळे नगरचे न्यायालयीन काम संपवून मूळ नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठीही त्यांना उशीर होणे सहाजिक आहे. नियुक्ती देताना ही गोष्टही विचारात घ्यायला हवी होती.

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

एका न्यायाधिकाऱ्याने नक्षलवादाचा बीमोड विकासाने करायला हवा असे मत एका दाव्याच्या संदर्भात व्यक्त केले. नक्षलवाद्यांच्या सहानुभूतीदारानी न्यायव्यवस्था पोखरलेली आहे एवढाच त्याचा अर्थ