रविवार, १ ऑगस्ट, २०१०

स्टेशन डायरीचे "पोस्टमॉर्टेम'!

"स्टेशन डायरी' हा त्या पोलिस ठाण्याचा जणू आरसाच असतो. पोलिस ठाण्याच्या हद्दीत क्षणाक्षणाला घडणाऱ्या नोंदी या डायरीत केल्या जातात. या डायरीवरून कोणत्या दिवशी त्या पोलिस ठाण्यात आणि हद्दीत काय काय घडले याचा लोखाजोखाच तयार होत असतो. या डायरीतील नोंदीने अनेकांना "वाचविले' आहे अन्‌ अनेकांना "अडकविले' असल्याचीही उदाहरणे पहायला मिळतात. एवढा महत्त्वपूर्ण दस्तऐवज असलेल्या या डायरीचा पोलिसांनी सोयीनुसार वापर केला नाही, तरच नवल. म्हणूनच  अनेक पोलिस ठाण्यात पान नंबर असलेल्या छापील डायऱ्यांऐवजी हाताने तयार केलेल्या कोऱ्या अन्‌ केव्हाही पाने बदलता येतील अशा डायऱ्या वापरल्या जात आहे.
-----

पोलिस ठाण्यात ठाणेअंमलदाराच्या टेबलावर मोठ्या आकारातील जी जाड डायरी ठेवलेली असते, तिला "स्टेशन डायरी' म्हणतात. पोलिस ठाण्यात अन्‌ हद्दीत घडणाऱ्या सर्व घटनांची, हालचालींची आणि गुन्ह्यांचीही नोंद या डायरीत केली जाते. शंभर पानांची ही डायरी दोन प्रतींमध्ये असते. गरजेनुसार एक संपली की, दुसरी डायरी आणली जाते. डायरीतील प्रत्येक पानांची एक प्रत पोलिस ठाण्यात अन्‌ दुसरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याकडे दररोज पाठविली जात असते. डायरीला तारीख, वार, वेळ, पान क्रमांक, नोंद क्रमांक, गुन्हा रजिष्टर क्रमांक असे क्रमांक असतात. रात्रीचे बारा ते रात्रीचे बारा हा डायरीचा एक दिवस. पोलिसांची वेळ चोवीस ताशी घड्याळाप्रमाणे असते. छापील नमुन्यात यासाठी रकाने छापलेले असतात. प्रत्येक पानाला क्रमांक दिलेले असतात. कोणत्या पोलिस ठाण्यात कोणत्या पान क्रमांकाची डायरी आहे, याच्या नोंदी पोलिस मुख्यालयात असणे अपेक्षित असते. डायरीत सहजासहजी बदल करता येऊ नयेत हा यामागील हेतू.

 मात्र केवळ शहरातच छापील डायऱ्या वापरल्या जातात. ग्रामीण पोलिस ठाण्यात सरसकट कोरे कागद एकत्र शिवून डायरी तयार केली जाते. त्यावर हाताने रकाने आखून हातानेच पान क्रमांक टाकले जातात. सरकारकडून पुरेशी स्टेशनरी मिळत नसल्याने हा उपाय शेधल्याचा कांगावा केला जात असला तरी त्यामागील कारण वेगळचे आहे.  डायरी ही प्रत्येक पोलिस ठाण्याची गरज असली तरी मागणी केल्याशिवाय ती न देण्याची पद्धत आहे. शिवाय मुख्यालयातील कारकुनांकडून स्टेशनरी मिळविणे पोलिसांसाठी आरोपी पकडण्यापेक्षा अवघड काम ठरते आहे. त्यातूनच ही "बनावट' डायरीची संकल्पना पुढे आली आहे. शिवाय या डायरीचा "फायदा'ही असल्याने तिचा वापर वाढला असल्याचे आढळून येते.

ठाणे अंमलदाराच्या ताब्यात ही डायरी असते. हवालदार व त्यापेक्षा वरच्या पदावरील अधिकारीच ठाणे अंमलदार म्हणून नियुक्त केले जातात. बाहेर जाताना डायरीचा "चार्ज' दुसऱ्याकडे देऊन जावा लागतो. पोलिस ठाण्याचा प्रमुख अधिकारी जेव्हा पोलिस ठाण्यात असेल तेव्हा आपोआपच तोच डायरीचा प्रमुख असतो. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा, तपासासाठी त्यांचे बाहेर जाणे, पोलिस ठाण्यात आलेले माहितीचे दूरध्वनी, तपासातील घडमोडी, हद्दीत घडलेल्या इतर घडामोडी या सर्वांच्या इत्यंभूत नोंदी डायरीत कराव्या लागतात. यातील अनेक नोंदी पुढे कायदेशीर पुरावा म्हणूनही वापरल्या जाऊ शकतात. पोलिसांच्या चौकशीतही डायरीतील नोंदीना महत्त्वाचे स्थान असते. कोऱ्या कागदापासून तयार केलेल्या या डायऱ्यांची पाने रात्रीतून बदलता येणे तुलनेत सोपे ठरते.

एका महत्त्वपूर्ण दस्तऐवजाची ही अवस्था! शिवाय डायरीतील नोंदीही अशा की, ज्याने लिहिल्या त्यालाही त्या परत वाचता येणार नाहीत, अशा असतात. या डायरीबद्दल बरेच नियम आहेत. त्यात सुधारणाही होतात. मात्र, अंमलबजावणी अभावाने होते. मुंबईसह अनेक मोठ्या शहरात फौजदार दर्जाचा अधिकारीच ठाणे अंमलदार असतो. त्याच्या मदतीला इतर कर्मचारी दिले जातात. इतर बऱ्याच ठिकाणी मात्र पोलिस नाईकच्या ताब्यातही डायरी असते अन्‌ फौजदार दर्जाचा अधिकारी त्याला मदत अगर मार्गदर्शन करतो. कारण बहुतांश पोलिस ठाण्यांचा करभार नियमांपेक्षा त्या पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याच्या मर्जीवर चालतो. काही वाद उत्पन्न झाल्यास डायरीतील नोदींची "जुळवाजुळव' करण्यासाठी मर्जीतील कर्मचारी हवेतच ना. बहुतांश पोलिस ठाण्यात होणाऱ्या डायरीच्या या "पोस्टमार्टम'चा पंचनामा कोणी करायचा? हा प्रश्‍न आहे.

३ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

aapalaa blog apratim aahe.tyatil he pratyek shabda vakya vachaniy aahe.

राम आप्पा यमगर म्हणाले...

सर माझ्या केस मध्य काही आरोपी फरार आहे केस क्र ४७७ व जावक क्र ४७१ व ४९८ Fir क्र i23/2013 पाच वर्ष झाले केस प्रलंबित आहे सर मला मदक करावे आसे अपेक्षा आहे अपेक्षा वाटपाहत आहे

राम आप्पा यमगर म्हणाले...

सर या Fir चे रितसर कारवाई करण्यात आले नसून घटने स्थली पहिला हल्ला अपंगा पत्नी वर करण्यात आला