गुरुवार, २४ डिसेंबर, २००९

वर्षभरात 58258 अपघाती मृत्यू

पोलिस ठाण्यात ज्यांची "अकस्मात मृत्यू' म्हणून नोंद केली जाते, अशा घटना गेल्या वर्षभरात (2008)राज्यात 58 हजार 258घडल्या आहेत. त्यांत सर्वाधिक आठ हजार 681 घटना मुंबईत घडल्या आहेत. त्याखालोखाल तीन हजार 763 मृत्यू पुण्यात झाले आहेत. राज्यात रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्यांची संख्या बारा हजार 950 होती. सर्वाधिक तीन हजार 573 मृत्यू दुचाकीस्वारांचे झाले आहेत. त्याखालोखाल दोन हजार 363 मृत्यू खासगी ट्रकच्या अपघातांमुळे झाले आहेत. अनोळखी वाहनाने धडक दिल्याने दोन हजार 587 लोकांचा मृत्यू झाला आहे. इतर मृत्यू नैसर्गिक अपत्ती किंवा अन्य अपघातांनी झालेले आहेत. बेकायदा प्रवासी वाहतूक, रस्त्यांची दुरवस्था आणि एकूणच सरकारी उदासीनतेचे हे बळी म्हणावे लागतील.

नगर जिल्ह्यात 2008 मध्ये "अकस्मात मृत्यू'च्या 1754 घटना नोंदल्या गेल्या आहेत. त्यांतील 687 रस्ते अपघात असून, 263 आत्महत्या आहेत. 804 लोकांचा मृत्यू इतर प्रकारचे अपघात, दुर्घटना, नैसर्गिक अपत्ती यांमध्ये झाला आहे. जिल्ह्यात जीप अपघातांतील मृतांची संख्या सर्वाधिक 175 आहे. त्याखालोखाल खासगी ट्रक अपघातात 162 लोक दगावले. दुचाकींच्या अपघातांमुळे 149 जण मृत्यू पावले आहेत. एसटी महामंडळाच्या बसच्या अपघातात मत्यू झालेल्यांची संख्या 26 असून, 13 लोक खासगी बसच्या अपघातांचे बळी ठरले. टेम्पोच्या अपघातांत 90, तर मोटारींच्या अपघातांत 47 लोक मृत्यू पावले आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 263 जणांनी आत्महत्या केल्या असून, त्यांतील 177 पुरुष आहेत.

जीपच्या अपघातांत मृतांची संख्या जास्त आहे. याचाच अर्थ, यातील बहुतांश लोक अवैध प्रवासी वाहतुकीचे बळी आहेत. रस्त्यांची स्थितीही तेवढीच जबाबदार म्हटली पाहिजे. अपघाती मृत्यूचे वार्षिक प्रमाण पाहता दिवसाला दीड मृत्यू रस्ते अपघातांत झाल्याचे दिसून येते. वर्षभरातील एकूण "अकस्मात मृत्यूं'चे प्रमाण लक्षात घेता, जिल्ह्यात रोज चार जणांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याचे दिसून येते. सरकारी पातळीवरील अनास्था, लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि लोकांची सोशिक, तसेच बेफिकीर वृत्तीही याला तेवढीच जबाबदार धरता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: