शनिवार, ४ एप्रिल, २००९

वकिलाचा भरदिवसा खून


मालमत्तेच्या लोभ कोणाला सुटलाय? त्यासाठी स्वकीयांचा खून करण्याच्या घटना अनेकदा घडतात. तशीच एक घटना नगरमध्ये घडली; मात्र यामध्ये नातलग महिलेने पुढाकार घेतल्याची अन्‌ सुपारी देऊन जवळच्या नात्यातील एका ज्येष्ठ वकिलाचाच खून केल्याची घटना घडली आहे. तिच्यासह तिचा पती आणि सुपारी घेतलेले दोघेही पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
ऍड. पीटर रतन साळवी. वयाची 75 वर्षे पूर्ण केलेले. मुलगा पोलिस दलात अधिकारी. मुलींची लग्न झालेली. पत्नीने मध्येच साथ सोडून इहलोकीची यात्रा संपविलेली. त्यामुळे साळवी सध्या आयुष्याची संध्याकाळ नगरच्या प्रकाशपूर भागातील आपल्या बंगल्यात एकटेच घालवीत होते. घरकाम करण्यासाठी एक मोलकरीण होती. इतर वेळी बंगल्यात ते एकटेच. पानसवाडी (ता. नेवासे) हे त्यांची मूळ गाव. तेथे त्यांची जमीन होती. ती विकून टाकण्याचा त्यांचा बेत होता. काही दिवसांपूर्वी त्यातील काही जमीन त्यांनी विकलीही; पण तीच त्यांचा घात करणारी ठरली.
अभिजित साळवी हा त्यांच्या चुलतभावाचा मुलगा. त्याने प्रेमविवाह केलेला. अभिजित कौर ही त्याची पत्नी. त्यांनीही या जमिनीवर हक्क सांगितलेला. त्यामुळे जमीन विकण्यास त्यांचा विरोध. अशाही स्थितीत जमीन विकल्याने दुखावलेल्या अभिजित आणि हरजित कौर यांनी साळवी यांचा खून करण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती. काम झाल्यावर सोनईत पैसे देण्यात येणार होते. सुपारी घेणारे साळवी यांच्याकडे कामाला होते.
खुनाची सुपारी घेतल्यानंतर आरोपी वायदंडे व वारुळे हे 29 एप्रिल सकाळीच साळवी यांच्या घरी आले; मात्र तेव्हा तेथे मोलकरीण होती. त्यामुळे "चर्चा करायची असून, नंतर येतो,' असा निरोप देऊन ते गेले. त्यानंतर ती दुचाकी घेऊन ते गंज बाजारात गेले. तेथून एका दुकानातून त्यांनी घास कापण्यासाठीचा विळा व सुती दोरी घेतली आणि दीडच्या सुमारास पुन्हा साळवी यांच्या घरी आले. तेथे त्यांनी त्यांच्या तोंडात बोळा कोंबून गळा दाबला. त्यांचा आवाज आल्यानंतर शेजारचे लोक धावून आले, तर पुढील दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे शेजारचे लोक मागील दाराकडे धावले. तेवढ्यात एक जण तेथून पळून जाताना दिसला. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.
घटनास्थळी सापडलेल्या दुचाकीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावरून पोलिसांना आरोपींची नावे मिळत गेली. घटनेनंतर पोलिसांनी या सर्वांकडे लक्ष केंद्रित केले असता, हे सर्व जण बाहेरगावी गेल्याचे आढळून आले. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत त्यांचा ठावठिकाणा शोधून काढला. वायदंडे व वारुळे यांना इंदापूर तालुक्‍यात अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ इतर दोघांनाही अटक झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: