गुरुवार, १ मार्च, २०१२

मद्यपी चालकाला 2 वर्षे शिक्षा, 5 हजार दंड

नवी दिल्ली - मद्य प्राशन करून बेदरकारपणे गाडी चालविणाऱ्यांना चाप बसण्यासाठी दोन वर्षांपर्यंत कारावास आणि 5 हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा अशा कडक तरतुदी असलेल्या मोटर वाहन कायद्यातील सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (गुरुवार) संमती दिली.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना जरब बसण्यासाठी मोटर वाहन कायद्यात सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाने आज संमती दिल्याने आता विधेयक संसदेत संमत होण्याची वाट मोकळी झाली आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेत हे विधेयक मांडले जाणार आहे.

या विधेयकातील तरतुदींनुसार, गाडीचा सीटबेल्ट लावला नाही, दुचाकी चालविताना हेल्मेट वापरले नाही किंवा सिग्नल तोडला तर चालकाकडून तब्बल 500 रुपये दंड वसूल केला जाईल. गाडी चालविताना मोबाईल फोन वापरला तरीही चालकाकडून दंड वसूल करण्याची तरतूद यात आहे. एकाच नियमाचा वारंवार भंग केल्यास दंडाच्या रकमेत वाढ करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. मद्यपी चालकांना जरब बसण्यासाठी विधेयकात आर्थिक दंडासह कारावासाची शिक्षा सुचविण्यात आली आहे. मर्यादेपेक्षा जास्त मद्य प्राशन करून गाडी चालविल्यास चालकाला दोन वर्षांपर्यंत कारावास आणि 5 हजार रुपये दंड तसेच दोन्ही होऊ शकतात. अल्पवयीन चालकाने वाहतुकीचे नियम तोडल्याचे लक्षात आल्यास गाडीच्या मालकाकडून दंड वसूल करण्याची तरतूद या विधेयकात आहे.

गाडी चालवताना सीटबेल्ट लावला नाही, दुचाकीवर हेल्मेट घातले नाही आणि सिग्नल तोडल्याचे वारंवार लक्षात आल्यावर चालकावर 500 रुपयांपासून 1 हजार 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. गाडी चालविताना मोबाईल वापरल्यास प्रारंभी 500 रुपये आणि त्यानंतर सुमारे 5 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. गाडी चालविताना चालक मोबाईल फोनवर बोलत असल्याने रस्त्यांवरील अपघातात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गाडी चालविताना मोबाईल फोन वापरणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: