मंगळवार, २३ ऑगस्ट, २०११

अण्णांच्या आंदोलनाचे गमक

भारतीयांचा एक स्वभाव आहे, त्यांना क्रांती करायला आवडते. फक्त आवश्यकता असते ती एका खंबीर आणि लोकमान्य नेतृत्वाची. कधी ते महात्मा गांधीच्या रुपाने तर कधी जयप्रकाश नारायण यांच्या रुपाने मिळाले. सध्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यामागेही भारतीय नागरिक याच पद्धतीने उभे राहिले आहेत. भारताचा स्वातंत्र्य लढा, त्यापूर्वीचा इतिहास आणि पुराणातील गोष्टींमध्येसुद्धा अशीच क्रांतीची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. खेळाडू किंवा अभिनेत्याला डोक्यावर घेणारी गर्दीही आपल्या देशात आहेच, पण ती गर्दी आणि आंदोलनासाठी झालेली गर्दी यामध्ये मोठा फरक आहे. याकडे सरकार आणि माध्यमांनाही दुर्लक्ष करून चालणार नाही.

लोकपाल विधेयकासाठी अण्णांनी आंदोलन पुकारल्यानंतर सरकारने सुरवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांची हेटाळणी आणि व्यक्तिगत आरोपी सुरू झाले. लोकांचा बुद्धीभेद करून आंदोलनाबद्दल गैरसमज पसरविण्याचा प्रयत्नही झाला. त्यामुळे सुरवातीच्या टप्प्यात सरकारने घेतलेले निर्णय अडचणीचे ठरत गेले. सरकारची ही अडचण आणि अण्णांचा ठामपणा यातून त्यांना मिळणारा पाठिंबा वाढत गेला. आज असा कोणताही घटक राहिला नाही, की त्याने अण्णांना पाठिंबा दिला नाही. अर्थात या आंदोलनाचे स्वरुप, पद्धत, त्यातील मागण्या आणि घटनेची चाैकट यांचा मेळ घातला तर ते किती योग्यअयोग्य ठरते, त्यावर मतप्रदर्शन येथे करायचे नाही, मात्र या आंदोलनाच्या यशाचे गमक काय असावे याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे.

अण्णा किंवा त्यांच्यामागे येणारे लोक प्रसिद्धीसाठी हे सर्व करीत आहेत, ही केवळ कॅमेरयासमोरील आंदोलने आहेत, अशा वावड्याही सुरवातीला उडविल्या गेल्या. पण जेव्हा आंदोलनांचे लोण खेड्यांपर्यंत आणि ज्यांना लोकपाल किंवा भ्रष्टाचार हेही माहिती नाही, अशा बालगोपाळांपर्यंत पोचले तेव्हा या टीकाकारांचे डोळे उघडले. अण्णांना पांठिबा देणारयांना दिसत होता तो अण्णांचा प्रामाणिकपणा आणि दुसरया बाजूला सरकारची लबाडी. त्यामुळे शेवटी सरकारला झुकावे लागले. तसे ते झुकले हे उशिरा सूचलेले शहाणपणच म्हणावे लागेल. कारण सरकारमधील इतर घटकांनी अंग काढून घेत सगळी जबाबदारी काँग्रेसवर टाकण्याचा प्रयत्न सुरू केल्याने त्याचे परिणाम डोळ्यासमोर दिसू लागले.

या आंदोलनातून आणखी एक गोष्ट अधोरेखित झाली आहे, ती म्हणजे भ्रष्टाचाराची झळ सर्वदूर बसत असून त्याविरोधात आता लोकांमध्ये जागृती झाली आहे. इंग्रजी राजवटीचे चटके बसल्याने स्वातंत्र्य लढ्याच्या हाकेला देशभरातून प्रतिसाद मिळाला होता. त्यातच गांधीजींसारखे नेतृत्व लाभल्याने लोकांचा विश्वास वाढीस लागला आणि अखेर इंग्रजी सत्ता उलथवून लावण्यात भारतीयांना यश आले. सामान्यांनी लढाई जिंकली, एक महासत्ता हारली. त्यानंतर सामान्यांचे राज्य आले.

आता या राज्यातही लोकांचा अपेक्षाभंग होऊ लागला आहे. इंग्रजी राजवट बरी होती, अशी म्हणायची वेळ आली. त्यामुळे जनता पुन्हा एकदा क्रांती करण्याच्या मनस्थितीत होती. सर्वांच्याच मनातील चीड आतल्या आत खदखदत होती. ती बाहेर पडण्यासाठी हवी होती ती योग्य संधी आणि तोलामोलाचे नेतृत्त्व. अण्णांच्या रुपाने या गोष्टींचा योग जुळून आला आणि सारा देश दुसरया स्वातंत्र्य. लढ्याप्रमाणे एकवटला गेला. हे खरे अण्णांच्या आंदोलनाच्या यशाचे गमक आहे. त्यामागे कोणा राजकीय पक्षांचा, भांडवलदारांचा आणि प्रसार माध्यमांचा हात आहे, या केवळ भ्रामक कल्पना आहेत.

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

भारतीयाना क्रांती करायला आवडते, पण ती घराबाहेर रहात असेल तरच.