सोमवार, २५ एप्रिल, २०११

कलमाडी हे एकटेच नव्हेत...

पुण्यातील खासदार सुरेश कलमाडी यांना सीबीआयनेअखेर अटक केली. राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनात काही शे कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. काँग्रेसनेही याची फारच तातडीने दखल घेत त्यांना लगेच पक्षातून निलंबित करून पक्षाची आब राखण्याचा प्रयत्न केला. जणू कलमाडी हे एकटेच अशा प्रकारचे नेते आहेत. खरे पहाता राज्यात विविध घोटाळ्यांत अडकलेल्या नेत्यांची कमी नाही. सर्वच पक्षांत असे नेते आहेत. या अटकेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय नेतृत्वाची सर्वसामान्यांना लाज वाटावी अशी स्थिती निर्माण झाली असली तरी हे प्रथमच घडते आहे, असे नाही. तरीही विविध पक्ष अशा नेत्यांना पाठीशी घालत आहेत आणि लोकही त्यांना निवडून देत आहेत.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अब्दुल रहमान अंतुले, शिवाजीराव निलंगेकर, शिवसेना भाजपा युतीचे मुख्यमंत्री मनोहर जोशी, नारायण राणे अशा अनेक राजकारण्यांची नावे कोणत्या ना कोणत्या प्रकरणात गोवली गेल्यामुळे कोर्टात ती प्रकरणे आहेत. राज्यातील काही राजकारणी खून, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांत आरोपी आहेत. ज्यांनी राज्य घडवायचे तेच नेते अशा वादाच्या भोव-यांत अडकत आहेत. महाराष्ट्राची जागतिक पातळीवरील ओळख काय असावी? घोटाळेबाज नेते? केवळ उच्चपदस्थच नव्हे अगदी ग्रामपंचायत ते संसद येथपर्यंत अनेक नेत्यांबद्दल असे आरोप होत असतात. अनेक नेते, वर पैसे द्यायला लागतात म्हणून आम्हाला विविध मार्गांनी निधी उभा करावा लागतो असेही खाजगीत सांगतात.

राजकारण करण्यासाठी प्रचंड पैसा लागतो आणि तो कोणत्या ना कोणत्या ना मार्गाने मिळवावा लागतो असे समीकरण येथे रूढ झाले आहे. त्यामुळे राजकीय नेते नको ते उद्योग करू लागले. अनुयायांना पोसाण्यासाठी पैसे लागतात म्हणत अनेक नेते वाममार्गाला लागले. ही स्थिती सर्वच पक्षांत पहायला मिळते. अनेक पक्षाच्या प्रमुखांचा मूळ व्यवसाय किंवा उत्पन्नाचे नेमके साधन काय हे कोणालाच सांगता येणार नाही. तरीही त्यांचे आणि त्यांच्यावर अवलंबून असणारया इतरांचे संसार झोकात कसे चालतात, हेही एक कोडेच आहे. अर्थात राजकारण हाच धंदा आहे, असेच त्यांच्या बाबतीत म्हणावे लागले. पक्ष निधी कशासाठी असतो, याचे उत्तर यामध्ये दडलेले असावे.

कलमाडी यांच्या कथित घोटाळ्याचे समर्थन करता येणार नाही. परुंतू त्यांना अटक झाली, म्हणजे इतरांनी आपण धुतल्या तांदळासारखे आहोत, अशा अविर्भावात टिकाटिप्पणी करू नये. शिवाय त्यांना पक्षातून तातडीने काढले, म्हणजे काँग्रेसेला लोक भला पक्ष म्हणतील असेही नाही. कलमाडी यांना अटक करण्यात जसा उशीर झाला, तसाच पक्षीय कारवाईच्याबाबतीतही उशीरच झाला.

शेवटी एक महत्त्वाचे. हे काहीही घडले तरी लोकांच्या मनावर फारसा परिणाम होत नाही. झाला तरी तो मतदानातून दिसत नाही. निवडणुकांच्यावेळी वेगळीच राजकीय गणिते खेळली जातात. घोटाळेबाज नेते आणि पक्ष त्याही बाबतीत तरबेज आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारी नेत्यांना आता जनताच धडा शिकवेल, असे विधान करणे सुद्धा धाडसाचे ठरते. घोटाळे होतात, चर्चा होते, निवडणुका येतात, लोक सगळे विसरून जातात, येणारे निवडून येतात आणि पुन्हा नवे घोटाळे होतच राहतात. घोटाळ्यांची मालिका सुरूच राहते. कारण कलमाडी हे एकटे नाहीत, हेच खरे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: