रविवार, १४ मार्च, २०१०

रिकाम्या हातानेच पोलिसांचा आगीशी सामना

कोणी तरी आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला असतो. त्यामुळे तेथे पोलिस बंदोबस्त लावलेला असतो; पण रिकाम्या हाताने. आंदोलक जेव्हा अंगावर रॉकेल ओतून पेटविण्याचा प्रयत्न करतो, किंवा निषेध म्हणून पुतळा पेटविला जातो, तेव्हा आग आटोक्‍यात आणण्यासाठी पोलिसांकडे काहीच नसते. ते रिकाम्या हातानेच प्रयत्न करतात अन्‌ स्वतः जखमी होऊन बसतात. अशा वेळी अग्निशमन यंत्रणा किंवा पाण्याचा टॅंकर मात्र तयार ठेवला जात नाही.

विविध मागण्यांसाठी आत्मदहन आंदोलने, निषेध म्हणून पुतळा जाळण्याची आंदोलने अलीकडे वाढली आहेत. अशी आंदोलने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली जातात. ती टाळण्यासाठी तेथे पोलिस बंदोबस्त तैनात केला जातो, तरीही काही लोक गुपचूप रॉकेल आणि काडेपेटी तेथे आणून आग लावून घेतातच. अशा वेळी पोलिसांची मोठी धावपळ होते. त्यांच्या हाताशी काहीही साधन नसते. हाताने किंवा लाठ्याकाठ्यांनी आग अटोक्‍यात आणण्याचे प्रयत्न होतात. त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांनाही भाजते.

अशी आंदोलने आता नेहमीची झाली आहेत; मात्र पोलिस त्यांच्या बंदोबस्ताच्या योजनेत बदल करायला तयार नाहीत. आंदोलने किंवा दंगलीच्या बंदोबस्तासाठी पोलिसांना पाण्याचे टॅंकर देण्यात आलेले आहेत. आक्रमक आंदोलकांना पाणी मारून पांगविण्याची पद्धत पोलिस दलात आहे. त्यासाठी प्रामुख्याने हे टॅंकर वापरले जातात. आगीशी सामना करण्यासाठीही त्यांचा उपयोग होऊ शकतो. पोलिस मात्र त्यांचा वापर करीत नाहीत. पूर्वनियोजित आंदोलनांच्या बंदोबस्तालाही पोलिस रिकाम्या हाताने जातात हे विशेष! जेथे जाळपोळ होण्याची शक्‍यता आहे, तेथे हा पाण्याचा टॅंकर घेऊन जायला काय हरकत आहे? त्यामुळे अशा दुर्घटना टाळता येऊ शकतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: