गुरुवार, २६ फेब्रुवारी, २००९

दिव्याने टाकला खुनावर प्रकाश


गुन्हाकेल्यावर आरोपी पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न करतात. गुन्हेगार कितीही सराईत असले तरी त्यांच्या हातून नकळत काही तरी चूक घडतेच. त्यातून मागे राहिलेली एखादी गोष्ट पोलिसांसाठी सुगावा ठरू शकते. पारनेर (जि. नगर) तालुक्‍यातील एका प्रकरणात आरोपींना शिक्षा झाली. खून केल्यावर आरोपींनी मृतदेह पुरला खरा; पण खोलीतील दिवा सुरूच राहिला, त्यानेच या प्रकरणावर प्रकाश टाकला...
कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांना सुगावा हवा असतो. त्याशिवाय त्यांना खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोचता येत नाही, मात्र असा सुगावा शोधण्यासाठीही पोलिसांना "दृष्टी' असावी लागते. मुरलेल्या अधिकाऱ्यांकडे असे कौशल्य पाहायला मिळते. अस्तगाव (ता. पारनेर) येथील काही वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेचा असाच किरकोळ व प्रथमदर्शनी शंका न येणाऱ्या सुगाव्यावरून तपास लागला अन्‌ आरोपींना शिक्षाही झाली. बाबाजी धर्मा पठारे हा दारूविक्रीचा व्यवसाय करत होता. त्यास प्रकाश दुर्योधन पवार (रा. वाळकी) हा दारू पुरवत असे. त्यातून त्यांची मैत्री झाली व मैत्रीतून दुर्योधनचे बाबाजीच्या पत्नीशी अनैतिक संबंध जडले. बाबाजीने पत्नीला अनेकदा समजावून सांगितले; परंतु प्रकाश तिचा पिच्छा सोडायला तयार नसल्याने बाबाजी व त्याची पत्नी वनिता यांनी गाव सोडून जाण्याचे ठरविले. बाबाजी व वनिता ठाणे जिल्ह्यात मुरबाड येथे राहायला गेले. मोलमजुरी करून जगू लागले; मात्र प्रकाश तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. तो तेथेही तिला भेटण्यास जाऊ लागला.या प्रकाराला वैतागल्याने शेवटी त्यांनी प्रकाशचा काटा काढण्याचा कट रचला. त्यासाठी ते आपल्या गावी अस्तगावला दोन दिवसांसाठी आले. ठरल्याप्रमाणे वनिताने दुर्योधनला दूरध्वनी करून मी गावी दोन दिवसांसाठी आले आहे, तू मला भेटण्यास येत जा, असे सांगितले. तिचा निरोप मिळताच प्रकाश आपल्या एका नोकराला घेऊन दुचाकीवरून रात्रीच अस्तगावला आला. तेथे गावात चौकातील दुकानासमोर गाडी लावून "मी जरा गावात जाऊन येतो,' असे सांगून वनिताकडे गेला. इकडे ठरल्याप्रमाणे बाबाजी घरात लपून बसला होता. प्रकाश घरात आल्यावर वनिताने त्याचे स्वागत केले. त्याला भरपूर दारू पाजली व त्यानंतर अचानक बाबाजी व वनिताने विळा, वरवंटा व सुरीने त्याच्यावर हल्ला चढविला. यामध्ये तो ठार झाला. त्यापूर्वीच वनिता व बाबाजी यांनी आपल्याच घराशेजारी असणाऱ्या जुन्या पडक्‍या घरात खड्डा खोदून ठेवला होता. त्यात त्याला गाडले व पुन्हा मुरबाडला निघून गेले; मात्र जाताना आपल्या घरातील लाइट बंद करण्याचे ते विसरले. पुढे नेमका तोच धागा पोलिसांना उपयुक्त ठरला.इकडे प्रकाश परत आलाच नाही, हे पाहून नोकरही गावी परतला. त्याच्या माहितीवरून नातेवाइकांनी दुर्योधन हरवल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदविली. त्याची चौकशी सुरू झाली. प्रकाशच्या नोकरांचा जबाब झाला. त्याने आपण एकत्र अस्तगावात गेलो होतो, तेथून प्रकाश परत येतो म्हणून गेला, तो सकाळपर्यंत परतला नसल्याचे सांगितले. त्यामुळे तपासासाठी पोलिस अस्तगावात गेले. तेथे लोकांच्या बोलण्यात त्याच्या अनैतिक संबंधाची कुणकुण पोलिसांना लागली. त्यामुळे पोलिसांनी बाबाजीच्या जुन्या घरावर लक्ष केंद्रित केले. पोलिस घराशेजारी गेले असता लाइट चालू असल्याचे दिसले. घरी कोणीच राहत नसताना लाइट सुरू कसा, असा प्रश्‍न पडला. त्यामुळे पोलिसांनी घर उघडले तर भिंतींवर रक्ताचे डाग दिसले. त्यामुळे त्यांचा संशय बळावला. जमिनीवर रक्त सांडलेले व हत्यारेही आढळली. त्यामुळे तेथे खून झाल्याचे उघड झाले; पण मृतदेह कोठे गेला, असा प्रश्‍न पडल्याने शोधाशोध सुरू झाली. तेथून जवळच असलेल्या दुसऱ्या एका बंद घराचा संशय आला. त्याचा दरवाजा तोडला असता तेथे नव्याने खोदल्याची जागा दिसली. तेथील माती काढली असता खड्ड्यात प्रकाशचा मृतदेह मिळाला. खुनाची घटना उघड झाल्यावर वनिता व बाबाजीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोघांवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हताच; पण परिस्थितीजन्य पुराव्यावर खटला चालला. न्यायालयात आलेल्या साक्षीपुराव्यांवरून गुन्हा सिद्ध झाला आणि दोघांनाही शिक्षा ठोठावण्यात आली. आरोपींच्या हातून सुटलेल्या सुगाव्याच्या आधारेच पोलिसांना गुन्हेगारांपर्यंत पोचता आले.

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

ही कथा जुनी आहे.. नवीन काही तरी द्यावे.. त्या लोकांनी किती शिक्षा झाली. याचाही उल्लेख हव होता.